कोणालाही खबर नाही, एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली:अमित शहांसोबत बंद दाराआड बैठक; गुप्त दिल्ली दौऱ्याने राजकारणात खळबळ

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अधिकच वाढताना दिसत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा रंगली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीबाबत अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात होते. अखेर मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रसारमाध्यमांशी बोलताना या भेटीला दुजोरा दिला. दिल्लीतील एनडीएच्या नेत्यांना भेटण्यात गैर काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित करत भविष्यातही अशा भेटी सुरू राहतील, असे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे या भेटीमागील राजकीय अर्थाला आणखी वजन मिळाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये सध्या मोठी रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेच्या 7 जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र भाजपकडून सुरुवातीला फक्त 5 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर हा आकडा 6 पर्यंत वाढल्याची चर्चा होती. जळगाव, नाशिक आणि रायगड या महत्त्वाच्या जागांवरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर अपेक्षित जागावाटप होत नसल्यानेच एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठून अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी त्यांनी अमित शहा यांची भेट घेण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र वेळ न मिळाल्यामुळे ती भेट होऊ शकली नव्हती आणि त्यानंतर ते महाराष्ट्रात परतले होते. तरीदेखील त्यांनी दिल्लीतील भाजप नेतृत्वाशी संपर्क कायम ठेवला होता. अखेर शनिवारी रात्री अमित शहा यांच्या कार्यालयाकडून भेटीसाठी निरोप आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रविवारी एकनाथ शिंदे कोणालाही माहिती न देता खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाले. या दौऱ्याची सर्वाधिक चर्चा यासाठी झाली की, एकनाथ शिंदे यांनी या भेटीबाबत पूर्ण गुप्तता पाळली होती. त्यांच्या सोबत कोणताही सहाय्यक किंवा अधिकृत ताफा नव्हता. त्यामुळे या भेटीमागे नेमकी काय राजकीय रणनीती आहे, याबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीहून थेट बंगळुरुला रवाना झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ते ठाण्यात परतल्याचे सांगितले जाते. या संपूर्ण दौऱ्यामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. एनडीएच्या नेत्यांना भेटलो तर त्यात चुकीचे काय? मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. दिल्लीला जाऊन एनडीएच्या नेत्यांना भेटलो तर त्यात चुकीचे काय? असा थेट सवाल त्यांनी केला. भविष्यातही दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संवाद आणि भेटी सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर दिल्ली भेट ही केवळ औपचारिक नव्हती, तर महत्त्वाच्या राजकीय चर्चांसाठीच होती, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषतः विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. जागांवरून सुरू असलेली रस्सीखेच आता दिल्लीपर्यंत दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसून पुढील काही दिवसांत आणखी बैठका होण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेत जागांवरून सुरू असलेली रस्सीखेच आता दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीनंतर महायुतीत काही मोठे बदल होणार का, तसेच विधान परिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!