मुंबई महानगरपालिकेत महापौरपदासाठी भाजपकडून मराठी उमेदवार देण्यात आल्याने ठाकरे गटाने या निवडीवर कोणताही अपशकून न करण्याची भूमिका घेतली आहे. गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही आकड्यांची गणिते मान्य करतो आणि ती मान्य केली आहेत. सत्ता कोणाचीही असो, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असा ठाम संदेश त्यांनी दिला. दबाव किंवा आमिष यांना बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपल्या विभागातील प्रश्न सभागृहात मांडेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले की, विरोधी पक्षाची भूमिका त्यांच्यासाठी नवीन नाही. सत्तेत असतानाही अनेकदा विरोधी पक्षाची भूमिका निभवावी लागली आहे, त्यामुळे आता ही जबाबदारी अधिक सजगपणे पार पाडली जाईल. त्यांनी सांगितले की, ही भूमिका केवळ एखाद्या व्यक्तीची नसून संपूर्ण पक्षाची आहे. शिस्तबद्ध आणि पद्धतशीर काम करत सभागृहात प्रभावी उपस्थिती राखली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. महापौरपदासाठी रितू तावडे आणि शीतल गंभीर या दोन नावांची चर्चा होती; मात्र अंतिम क्षणी रितू तावडे यांच्या नावावर एकमत झाले. यंदा महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असल्याने या निवडीकडे विशेष लक्ष लागले होते. उपमहापौरपदाबाबतही चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी संजय घाडी यांचा उपमहापौर म्हणून सव्वा वर्षांचा कार्यकाळ असेल, असे जाहीर केले. त्यामुळे मुंबई मनपात भाजप आणि शिंदे गट सत्तेत तर ठाकरे गट विरोधी पक्षाच्या भूमिकेत असे स्पष्ट राजकीय समीकरण उभे राहिले आहे. मराठी उमेदवार महापौरपदी देत भाजपचा संदेश मुंबई मनपाची महापौर निवडणूक 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे. भाजपने प्रथमच महापौरपदी महिला चेहरा देत रितू तावडे यांची निवड केली आहे. त्या भाजपच्या मुंबईतील पहिल्या महिला महापौर ठरणार आहेत. या निवडीमुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी उमेदवार महापौरपदी देत भाजपने एक संदेश दिल्याची चर्चा रंगत आहे. मुंबई महानगरपालिकेत नवे राजकीय चित्र महापौरपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर रितू तावडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, महापौरपद मिळाले असले तरी मी स्वतःला मुंबईची सेवक मानते. सभागृहाची गरिमा राखत पक्षभेद विसरून काम व्हावे, हीच अपेक्षा आहे. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेवक निवडून आले असून सर्वांनी मिळून काम करावे, असे त्यांनी आवाहन केले.या घडामोडींमुळे मुंबई महानगरपालिकेत नवे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. एका बाजूला भाजप-शिंदे गट सत्तेत असून दुसऱ्या बाजूला ठाकरे गट सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यास सज्ज आहे. येत्या काळात सभागृहातील कामकाज, प्रश्नांची मांडणी आणि निर्णयप्रक्रियेत या तिन्ही गटांची भूमिका कशी राहते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. मुंबई महापौर पदासाठी भाजपकडून रीतू तावडे, शिवसेनेकडून संजय खाडी रिंगणात:संघटनात्मक ताकद, राजकीय गणित लक्षात घेऊन निवड कोण आहेत मुंबई महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे:सभागृहात चार माजी महापौरांचे आव्हान; म्हणाल्या- मुंबईची सेवक म्हणून काम करणार भाजपचा गुजराती बालेकिल्ल्यातून मराठी हिंदू चेहरा:भाजपची स्मार्ट चाल यशस्वी; ठाकरे बंधुंना सडेतोड उत्तरासह पक्षाचा डबल फायदा
