भंडारा जिल्ह्यात बोर्ड परीक्षेचा बिगुल:कॉपी अन् तणावमुक्तीसाठी प्रशासन सज्ज; ८८ केंद्रांवर १० वी, ६७ केंद्रांवर १२ वीची परीक्षा

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून, तर इयत्ता १० वीच्या परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहेत. या परीक्षा भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी भंडारा जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग पूर्णतः सज्ज झाला आहे. “भीती नको, पण तयारी हवी” असा मोलाचा सल्ला तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. जिल्ह्यातील परीक्षार्थींची आकडेवारी यावर्षी जिल्ह्यातून इयत्ता १० वीचे एकूण १५,९३५ विद्यार्थी ८८ केंद्रांवरून परीक्षा देतील. तर, इयत्ता १२ वीचे एकूण २०,३५७ परीक्षार्थी ६७ केंद्रांवरून ही परीक्षा देणार आहेत. तालुकानिहाय परीक्षा केंद्रांची आणि विद्यार्थ्यांची स्थिती कॉपीमुक्त अभियानाची वज्रमूठ जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष ‘कॉपीमुक्त सप्ताह’ राबवून जनजागृती केली आहे. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी सहा भरारी पथके तैनात करण्यात आली असून, यामध्ये महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. याशिवाय, केंद्रांवर बैठे पथक पूर्णवेळ लक्ष ठेवून असेल. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष जिल्ह्यात इयत्ता १० वीची ४ आणि १२ वीची ५ केंद्रे ‘उपद्रवी’ (संवेदनशील) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असेल. जर कोणत्याही केंद्रावर गैरमार्ग आढळून आला, तर त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे. विद्यार्थ्यांना आवाहन तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी तज्ज्ञ सुलभकांद्वारे समुपदेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र सोनटक्के व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिषा गजभिये यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, “विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात योग्य आहार घ्यावा, पुरेशी झोप घ्यावी आणि कोणत्याही दडपणाशिवाय पारदर्शकपणे परीक्षा द्यावी.”

Leave a Comment

error: Content is protected !!