Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मोठी बातमी:संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेग, आरोप निश्चित; वाल्मिक कराड प्रथमच न्यायालयात बोलला, नेमकं काय घडलं?

खंडणीच्या व्यवहारात अडथळा निर्माण केल्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा ठपका अखेर न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्टपणे समोर आला आहे. बीड येथील विशेष मकोका न्यायालयात आज या बहुचर्चित हत्या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, न्यायालयाने सर्व आरोपींवरील आरोप अधिकृतपणे निश्चित केले असून खटला लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आरोपींकडून खटला लांबवण्याचा प्रयत्न होत असला, तरी न्यायालयाने त्याला आळा घातल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली असून त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने जनआक्रोश आणखी वाढला. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून उर्वरित सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या घटनेनंतर बीडसह राज्यातील अनेक ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. मारहाणीचे व्हिडीओ समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. या हत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे नाव समोर आल्यानंतर थेट मुंडे यांच्यावरही आरोप झाले. वाढत्या दबावामुळे अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती. वाल्मिक कराड प्रथमच न्यायालयात बोलला; सुनावणीत नेमकं काय घडलं? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान विशेष मकोका न्यायालयात महत्त्वाची घडामोड घडली. न्यायालयाने सर्व आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपशीलवार घटनाक्रम एकेक करून वाचून दाखवला. त्यानंतर न्यायाधीशांनी प्रत्येक आरोपीला, हे सर्व आरोप तुम्हाला मान्य आहेत का? असा थेट प्रश्न विचारला. या प्रश्नावर वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी एकमुखाने आरोप नाकारले. विशेष म्हणजे, या प्रकरणात वाल्मिक कराड याने प्रथमच स्वतःहून न्यायालयासमोर उभं राहून आरोप मला मान्य नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं. याआधी तो कोणत्याही न्यायालयीन सुनावणीत बोललेला नव्हता. आरोप निश्चित झाल्यानंतर आता या खटल्याची पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार असून, त्या दिवशी पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. खंडणीला अडथळा ठरल्यानेच संतोष देशमुखांची हत्या; उज्ज्वल निकम यांचा आरोप या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रकरणातील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आज न्यायालयाने सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले आहेत. खंडणीच्या व्यवहारात अडथळा निर्माण केल्यामुळेच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली, हे तपासातून स्पष्ट झाले आहे. निकम यांनी असा आरोपही केला की, आरोपींच्या वकिलांकडून वारंवार ‘डिले’ आणि ‘डिरेल’ करण्याचा प्रयत्न होत आहे. एकाच कारणांची पुनरावृत्ती करत खटल्याला विलंब लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे न्यायालयाने योग्य आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. लवकरच प्रत्यक्ष पुराव्यांच्या सादरीकरणाला सुरुवात होणार असून, हा खटला फास्टट्रॅक पद्धतीने चालवून तो शक्य तितक्या लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. पुढील सुनावणी आता 8 जानेवारी रोजी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींचे वकील उपस्थित होते, तर सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपींवरील आरोपांचे वाचन करून दाखवले. मात्र, वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आपल्यावरील आरोप मान्य नसल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केले. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 8 जानेवारी रोजी होणार आहे. न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रयत्न सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, खंडणी मिळण्यास अडथळा निर्माण झाला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, हे तपासातून स्पष्ट झाले आहे. आरोपींच्या वकिलांकडून ‘डी फॉर डिले’ आणि ‘डी फॉर डिरेल’ म्हणजेच खटला लांबवण्याचा आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, न्यायालयाने तो ओळखून योग्य आदेश दिले आहेत. प्रत्यक्ष पुराव्यांचे सादरीकरण लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात असो वा अन्य कोणत्याही न्यायालयात, न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेला वेग मिळाल्याने पीडित कुटुंबासह संपूर्ण राज्याला न्यायाची अपेक्षा आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!