महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होताच महायुतीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे या विजयाचा कोणताही जल्लोष न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या निधनानंतर सर्व कार्यकर्त्यांना मिरवणुका आणि मोठे सोहळे टाळण्याच्या सूचना दिल्या होत्या,” अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज दिली. फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळेच कार्यकर्त्यांनी ही निवडणूक केवळ संघटनात्मक पातळीवर आणि ‘बूथ’ स्तरावर लढवली, असेही त्यांनी नमूद केले. रवींद्र चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, फडणवीस प्रत्येक निवडणुकीसाठी अहोरात्र कष्ट घेतात. “अजितदादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले होते की, मोठ्या प्रचारसभा किंवा शक्तीप्रदर्शन करू नका. ही निवडणूक शांततेत आणि संघटनात्मकदृष्ट्या सूक्ष्म स्तरावर लढा. त्यांच्या या संवेदनशील निर्णयाचा आम्ही सर्वांनी आदर केला आणि निकालांनी हे सिद्ध केले की जनतेला आमची कार्यपद्धती मान्य आहे,” असे चव्हाण म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या कार्याची पावती या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीला देताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, “गेल्या ११ वर्षांत मोदींनी शेतकरी, कष्टकरी आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक वर्गाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी अनेक योजना राबवल्या. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षांत ज्या ताकदीने काम केले, त्याचीच ही फलश्रुती आहे.” निकालांचे चित्र: १२ जिल्हा परिषदांवर महायुतीची सत्ता रवींद्र चव्हाण म्हणाले, कोरोना नंतरच्या काळात या निवडणुका लांबणीवर पडल्या. आज निकाल अद्याप स्पष्ट झाले नाहीत. पण निकालाचे कल जे सांगत आहेत, त्यानुसार १२ जिल्हा परिषदांवर महायुतीची सत्ता बसेल, असे चित्र समोर दिसत आहे. १२५ पेक्षा पंचायत समित्यांमध्ये सु्द्धा भाजप ५० पेक्षा जास्त ठिकाणी सत्ता स्थापन करेल आणि महायुती या सगळ्या भागांमध्ये जवळजवळ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल पाहता, ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकप्रतिनिधी महायुतीचे निवडून येताना दिसत आहे. हा विजय जनतेने दिलेला कौल आहे. महाराष्ट्रातील सर्व मतदारांचे महायुतीच्या वतीने मन: पूर्वक आभार मानतो. कोकणात महायुतीचे निर्विवाद वर्चस्व कोकणातील निकालांवर भाष्य करताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, “गेल्या काही निवडणुकांचे निकाल पाहता, कोकण महायुतीचे आहे हे पुन्हा आजच्या निकालानंतर ग्रामीण भागात सिद्ध झाले आहे. ग्रामीण भागातील मतदारांनी महायुतीच्या बाजूने दिलेला हा कौल अत्यंत महत्त्वपूर्ण असून, सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार मानतो.”