नकारात्मक प्रचारामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचा पराभव झाल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीला राज्यात मोठे यश मिळाल्याचेही ते यावेळी म्हणाले. राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांसाठी गत शनिवारी निवडणूक झाली होती. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी महायुतीचा बहुतांश जागांवर विजय झाला, तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने आपली पराभवाची मालिका सुरू ठेवली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या पराभवासाठी त्यांचा नकारात्मक प्रचार कारणीभूत ठरल्याचा दावा केला. पुण्यात अजित पवारांच्या पक्षाला यश
ते म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला गेलो, तेव्हा आम्ही ग्रामीण भागातील जनतेपुढे केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिन सरकारच्या योजना मांडल्या. आज मला आनंद वाटतो की, फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आम्हाला महाराष्ट्रात एक मोठे यश मिळाले. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला. हा जिल्हा अजित पवार यांच्याच पाठिशी आहे. येथे अजित पवारांना मते मिळाली असले तरी ती पर्यायाने महायुतीलाच मिळाली आहेत. महाराष्ट्रात महायुतीचाच विजय होईल. त्यानंतर काही अजित पवारांचे, तर काही एकनाथ शिंदे यांचे अध्यक्ष होतील. अधिकाधिक ठिकाणी भाजपचे अध्यक्ष होतील. पण महाराष्ट्रात सर्वत्र महायुतीचेच चित्र दिसेल हे निश्चित आहे. नकारात्मक प्रचारामु्ळे विरोधकांचा पराभव या निवडणुकीत विरोधी पक्षांना मोठा दणका बसल्याची बाब पत्रकारांनी यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ते म्हणाले, या निवडणुकीत महाविकास आघाडी नेमकी खाली गेली आहे. कारण, त्यांच्या भूमिका चूकत आहेत. टीकाटिप्पणी करण्याच्या भूमिकेला आता महाराष्ट्र मत देत नाही. महाराष्ट्र विकासाला मतदान करतो. त्यामुळे टीकाटिप्पणीवर काही मतदान मिळणार नाही. निगेटिव्ह बोलून मतदान मिळणार नाही. काँग्रेसने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रचार केला. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. शरद पवार महाविकास आघाडीला मार्गदर्शन करण्यात कमी पडले. त्यांनी ते मार्गदर्शन केले असले तरी, त्यांचे निकाल अत्यंत वाईट आले आहेत. या प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. काँग्रेसच्या आतापर्यंत भूमिकाच चुकत आल्यात. त्यांच्या भूमिका या नकारात्मक आहेत. त्यांनी सकारात्मक प्रचार करण्याची गरज होती. विकासाच्या योजना मांडण्याची गरज होती. काँग्रेसची स्थिती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात वाईट आहे. कारण, त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. जिथे व्हिजन नाही, तिथे जनता नाही. जिथे व्हिजन आहे, तिथे लोकं आहेत. चंद्रपुरात विरोधी बाकावर बसण्याचे संकेत चंद्रपूर महापालिकेत महापौरपदाच्या निवडीवरून मोठी चुरस निर्माण झाली आहे. भाजप या प्रकरणी काही प्रयत्न करत आहे का? असा प्रश्नही पत्रकारांनी यावेळी बावनकुळेंना विचारला. त्यावर ते म्हणाले, भाजपने असा विचार केला आहे की, कुणी आपल्यासोबत आले तर आम्ही नाही म्हणणार नाही. पण कुणी आले नाही तर आम्ही विरोधी पक्षात बसू. आमची विरोधी पक्षातही बसण्याची तयारी आहे, असे ते म्हणाले.
