‘गुराखी’ आणि ‘सुपरवायझर’ म्हणत हिणावले:पुतण्या धनंजय सावंत यांचे काका तानाजी सावंतांना चोख प्रत्युत्तर; जवळा गटातून विजयी

धाराशिव जिल्ह्यातील सर्वात चर्चित आणि संघर्षाची ठरलेली जवळा जिल्हा परिषद गटाची लढत अखेर पुतण्याने मारली आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी अपक्ष (भाजप पुरस्कृत) निवडणूक लढवत आपल्या काकांच्या राजकीय साम्राज्याला मोठे भगदाड पाडले आहे. मतमोजणीअंती धनंजय सावंत यांनी सुमारे २ हजार १०० मतांच्या फरकाने विजय मिळवत जवळा गटात ‘बंडाचा झेंडा’ यशस्वीपणे रोवला आहे. शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार जवळा गटातून उभे होते. मात्र, धनंजय सावंत यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरत, बंडाचे निशाण फडकावले होते. त्यांना भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला होता. आता जनतेने त्यांना भरघोस कौल दिला. या विजयामुळे तानाजी सावंत यांचे जिल्ह्यातील एकहाती वर्चस्व आता धोक्यात आले आहे. धनंजय यांनी आपल्या समर्थ संघटनेच्या जोरावर काकांचा ‘अभेद्य’ गड भुईसपाट केला आहे. तुम्ही पातळी सोडली, आता तांडव पाहा या निवडणुकीत काका-पुतण्यांमधील संघर्ष केवळ राजकीय न राहता वैयक्तिक पातळीवर पोहोचला होता. प्रचारादरम्यान तानाजी सावंत यांनी धनंजय यांचा उल्लेख ‘गुराखी’ आणि ‘सुपरवायझर’ असा करत त्यांना हिणवले होते. “बापाच्या नादी लागायचं नाही,” असा दमही त्यांनी जाहीर सभेतून दिला होता. या अपमानाचा घाव जिव्हारी लागलेल्या धनंजय सावंतांनी, “तुम्ही तुमची पातळी सोडली आहे, आता माझा तांडव पाहा,” असे खुले आव्हान दिले होते. आजच्या निकालाने मतदारांनी धनंजय यांच्या ‘तांडवा’ला साथ देत तानाजी सावंतांची मस्ती उतरवल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे. तानाजी सावंतांना ‘दुहेरी’ धक्का: बालेकिल्ल्यातही हार! पुतण्याने पराभूत केले असतानाच, तानाजी सावंत यांना दुसरा मोठा धक्का त्यांच्या स्वतःच्या गावात आणि बालेकिल्ल्यात बसला आहे. तानाजी सावंत यांचे स्वतःचे मतदान असलेल्या डोंजा गटातही शिंदे शिवसेनेचा दारुण पराभव झाला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवाराने बाजी मारत सावंतांना घरच्या मैदानावर चारीमुंड्या चित केले आहे. शिंदे सेनेची पीछेहाट धनंजय सावंतांनी केलेल्या बंडाचा फायदा त्यांना आपल्या समर्थ संघटनेच्या जोरावर मिळाला आहे. एका बाजूला संपूर्ण यंत्रणा आणि माजी मंत्र्यांची ताकद, तर दुसरीकडे केवळ जनसंपर्क आणि अपमानाचा राग या लढतीत पुतण्याची सरशी झाली. या पराभवामुळे जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या समीकरणांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे ही वाचा… झेडपी निवडणुकीत दिग्गजांच्या वारसांनी मारली बाजी!:वळसे पाटील, सावंत, गोगावले आणि जाधव कुटुंबांचे वर्चस्व कायम राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. या निवडणुकीत सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांनी मिळवलेले घवघवीत यश. आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेत या वारसांनी विरोधकांना धूळ चारली असून, अनेक मतदारसंघांमध्ये घराणेशाहीचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. सविस्तर वाचा…

Leave a Comment

error: Content is protected !!