राष्ट्रवादीच्या विलीनकरण संदर्भात त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याविषयी माझा बोलण्याचा काहीही संबंध नाही. त्यांचा पक्षांतर्गत निर्णय झाल्यानंतर ते महायुतीकडे तसा प्रस्ताव घेऊन येतील. त्यानंतर मात्र, नक्कीच याविषयी बोलणे योग्य ठरेल. मात्र, तोपर्यंत हवेत पतंगबाजी का करायची? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. या माध्यमातून राष्ट्रवादीच्या विलीनकरणाविषयी फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक होती. तर उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांची देखील ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होती. मात्र, दुखवट्यामुळे केवळ शब्दसुमनांनी आम्ही सुनेत्रा पवार यांचे स्वागत केले. अजित पवार यांच्या स्वप्नांना पूर्ण करत त्यांच्या प्रमाणेच सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून कामे होतील, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली आणि शोक प्रस्ताव मंजूर सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज सुनेत्रा पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी संयमाने जबाबदारी स्वीकारली आहे. म्हणूनच, आज आम्ही त्यांचे स्वागत केले. मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पक्ष आणखी मोठे यश मिळवेल. त्यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाच्या निर्णय प्रक्रियेवर चर्चा करणे योग्य नाही. त्या स्वतः तो निर्णय घेतील. आज मंत्रिमंडळाने अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आणि शोक प्रस्ताव मंजूर केला. चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर झाल्याचा आनंद चंद्रपूर मध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला असल्याची माहिती मला आत्ताच मिळाली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. मात्र त्या मागील राजकारणाची सध्या आपल्याला काहीही कल्पना नसल्याचं ते म्हणाले. यासंबंधी माहिती घेऊन मी बोलेल. भाजपच्या महापौर झाल्यामुळे त्यांचे माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. भाजपचा महापौर झाल्याचा आपल्याला देखील आनंद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.