देशात संसदेचे कामकाज सुरू असताना आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलण्यापासून रोखले जात असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मलेशियात जाऊन मौजा करत आहेत. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलण्यापासून राहुल गांधींना हा ‘देशद्रोह’ आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपची कार्यपद्धती, संसदेतील कोंडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू दिले जात नाही. काल लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी बैठकी घेतली. डेडलॉक कधी संपणार याबाबत संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, डेडलॉक संपवण्याची जबाबदारी सरकारी पक्षाचे असते. पंतप्रधान मलेशियात मौजा मारत आहेत. अनवर इब्राहिमला मिठ्या मारत आहेत. अनवर इब्राहिम कधी काळी अंत्यत गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात जेफ्री एफस्टिन प्रमाणेच अडकले होते. त्यांना ज्याप्रमाणे मिठ्या मारताना आमच्या पंतप्रधानांना पाहिले, अनेकांना धक्का बसला. इथे संसद सुरू आहे आणि पंतप्रधान परदेशात आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले जात नाही आणि परदेशात जाऊन लोकशाहीवर लेक्चर, व्याख्याने देत आहेत. या देशाचे काय होणार? देशाचे भविष्य काय आहे? हे कळत नाहीये. मोदींनी ट्रम्पपुढे गुडघे टेकलेत संजय राऊत म्हणाले, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी तेल खरेदीबाबत भारतीय जनतेला मार्गदर्शन केलेले आहे. त्यामुळे मोदींचे बिंग फुटलेले आहे. मोदी यांनी पूर्णपणे ज्या पद्धतीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यापुढे गुडघे टेकलेत, ही अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक गोष्ट आहे. अशावेळी लोकसभेत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर, या देशाचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी काही भूमिका मांडत असतील आणि त्यांना रोखणे, बोलू न देणे, हा एकप्रकारचा देशद्रोह आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव विरोधी पक्ष आणेल. आज त्यासंदर्भातील नोटीस देण्यात येईल. भाजपचा आणि नियमांचा काही संबंध नाही संजय राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्ष आणि नियम व कायद्यांचा काही संबंध नाही. भाजप हा हुकूमशाही पद्धतीने चालणारा आणि चालवला गेलेला पक्ष आहे. भाजप टाचेखाली देशाचे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, निवडणूक आयोगसह सर्व संविधानिक संस्था आहेत. कोणालाही काम करू दिले जात नाही. हुकूमशाही पद्धतीने अमित शहा आणि नरेंद्र मोदी काम करत आहेत. नियम, कायदा, संविधान याची कोणतीही चारया या सरकारला मला दिसत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ओम बिर्ला यांच्यावर मोदी आणि शहांचा प्रचंड दबाव असल्याचा त्यांच्या चेहऱ्यावरून आणि बॉडी लँग्वेजवरून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाकडील कोणतेही सहकार्य स्वीकारले नाही. भाजपला मदत न करण्याची ठाकरेंची भूमिका चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेविषयी शिवसेना ठाकरे गटाची भूमिका काय? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, एकवेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावे लागले तरी चालेल, पण भाजपला मदत होईल किंवा भाजपची सत्ता स्थापन होईल, अशी प्रकारची कोणतीही भूमिका आपल्याला घेता येणार नाही, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकऱ्यांना दिलेल्या आहेत. ‘तटस्थ’ राहणे हीच मतदारांशी प्रामाणिकता छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका तटस्थ राहण्याची असल्याचे अंबादास दानवेंनी म्हटले आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हा पक्षाचा निर्णय आहे. एका बाजूला एमआयएम आहे, दुसऱ्या बाजूला गद्दारांचे पक्ष आहेत. त्यामुळे आम्हाला कुणाच्याही बाजूला जाणे ही मतदारांशी बेईमानी करण्यासारखे आहे. त्यामुळे अंबादास दानवेंनी मांडलेली भूमिका योग्य आहे.