माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागवलेल्या माहितीला उत्तर देताना, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) फसवणुकीची एक अत्यंत धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या तीन वर्षांत सायबर गुन्हेगार आणि भामट्यांनी बँकेच्या यंत्रणेचा गैरवापर करून हजारो कोटी रुपयांची लूट केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. बँकेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2026 या तीन वर्षांच्या कालावधीत स्टेट बँकेत एकूण 30,746 फसवणुकीची प्रकरणे समोर आली असून, यामध्ये ग्राहकांचे आणि बँकेचे तब्बल 6,313.35 कोटी रुपये अडकले आहेत. बँकेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, वर्षनिहाय फसवणुकीची आकडेवारी (1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2026)
डिजिटल माध्यमांनुसार झालेली फसवणूक मोबाईल बँकिंग आणि यूपीआयचा वाढता वापर सायबर भामट्यांसाठी सोपे लक्ष्य बनला आहे. बँकेच्या तीन वर्षांच्या एकत्रित आकडेवारीनुसार, ऑनलाईन माध्यमांतून झालेली फसवणूक लक्षणीय आहे. यात सर्वाधिक 12,868 गुन्हे यूपीआय फ्रॉडचे असून, त्यात 71.51 कोटी रुपये गेले आहेत. इंटरनेट बँकिंगद्वारे 8,657 गुन्ह्यांमध्ये 79.58 कोटी रुपयांवर डल्ला मारण्यात आला. एटीएम फ्रॉडच्या 1,102 प्रकरणांमध्ये 9.58 कोटी, तर मोबाईल बँकिंगच्या 296 गुन्ह्यांमध्ये 3.66 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. बँक कर्मचाऱ्यांनी केली हेराफेरी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या अंतर्गत फसवणुकीची 303 प्रकरणे समोर आली असून, त्यात 311.08 कोटींची हेराफेरी झाली आहे. स्टेट बँकेच्या संपूर्ण देशातील शाखांचा विचार करता, फसवणुकीच्या आणि गुन्ह्यांच्या बाबतीत पश्चिम बंगाल हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. एकट्या पश्चिम बंगालमध्ये 3,426 फ्रॉडचे गुन्हे नोंदवले गेले असून, तेथील नागरिकांना 143.67 कोटींचा फटका बसला आहे. सध्या देशात गाजत असलेल्या ‘डिजिटल अरेस्ट’ फ्रॉडबाबत बँकेकडे अद्याप कोणतीही अचूक माहिती उपलब्ध नाही, असे बँकेने म्हटले आहे. डिजिटल युगात बँकिंग सेवा जितकी सोयीची झाली आहे, तितकाच सायबर भामट्यांचा धोका वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपला ओटीपी, पासवर्ड किंवा कोणत्याही अनोळखी लिंक्सवर क्लिक न करता स्वतःची सुरक्षा स्वतः करणे महत्त्वाचे आहे.