शरद पवार गटाचा शिंदे गटावर पलटवार:खासदार ज्योती वाघमारे ऑपरेशन केव्हापासून करायला लागल्या कळले नाही – शशिकांत शिंदे

सत्ताधारी शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे. खासदार ज्योती वाघमारे दिल्लीत जाऊन केव्हापासून ऑपरेशन करायला लागल्या हे कळत नाही, असे ते म्हणालेत. प्रा. ज्योती वाघमारे नुकत्याच एका कार्यक्रमासाठी नांदेड दौऱ्यावर गेल्या होत्या. तिथे त्यांनी ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी होणार, पण ते योग्य वेळी होणार, असे सांगत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले, ज्योती वाघमारे यांना प्रथमच राज्यसभेवर संधी मिळाली आहे. त्यामुळे त्या जनतेच्या प्रश्नावर बोलतील अशी अपेक्षा आहे. पण दिल्लीत गेल्यानंतर त्या ऑपरेशन कधीपासून करायला लागल्या हे मला कळत नाही. ज्योती वाघमारे यांनी ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावे. आता इराण व अमेरिका – इस्त्रायल युद्ध सुरू आहे. त्याचा मोठा जनतेला बसत आहे. या प्रकरणी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. वाघमारे यांनी या अडचणींवर बोलावे. ते म्हणाले, ऑटो चालकांना शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यापुढे प्रश्न मांडताना अश्रू अनावर झाले होते. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही गॅस टंचाईविषयी पत्रातून भाष्य केले आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही प्रकारची गॅस टंचाई नसल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे गॅस टंचाईमुळे हॉटेलांमधील पदार्थ कमी होत आहेत. त्यामुळे ज्योती वाघमारे यांनी ही टंचाई, युद्ध परिस्थिती व भविष्यातील संकट यावरही लक्ष द्यावे. आमचा एकही खासदार फुटणार नाही शशिकांत शिंदे म्हणाले, माझ्या माहितीनुसार शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यासह आमचे खासदार दिल्लीत युद्ध व त्याचे परिणाम यावर आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. त्यामुळे आमचे ऑपरेशन वगैरे काही होणार नाही. एखादेवेळी पर्याय निर्माण होतो आणि तो पर्याय आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार साहेबांचा पक्ष चर्चेत आणण्याचे काम कोण करत आहे? हे ऑपरेशन राज्यात व केंद्रात कशासाठी केले जात आहे? आमचा एकही खासदार फुटणार नाही. सत्ताधारी पक्षाकडे एवढे बहुमत असताना हे फोडाफोडीचे राजकारण का केले जात आहे हे मला कळत नाही, असे ते म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!