Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची घोडदौड:कोकणात पुन्हा एकदा भगव्याची लाट, ठाकरे गटाचा सुपडा साफ

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा मोठं यश मिळाले आहे. मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितींमध्ये ४५ टक्के स्ट्राईक रेट राहिला. कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेची भगवी लाट आली असून रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला. रायगड आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. या निवडणुकीत महायुती सुसाट असून उबाठा आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. राज्यातील जनतेने सलग चौथ्या निवडणुकीत शिवसेनेला भरघोस मतदान करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. जिल्हा परिषद निवडणुकीत १५७ उमेदवार निवडून आले तर पंचायत समितींसाठी शिवसेनेचे ३१५ विजयी झाले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा परिषदांसाठी १५ जाहीर सभा घेतल्या होत्या. रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला. १२५ पंचायत समित्यांपैका २५ हून अधिक पंचायत समित्यांची सत्ता शिवसेनेला मिळाली. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचे १९ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १३ उमेदवार विजयी झाले असून शिवसेनेचा ६५ टक्के स्ट्राईक रेट नोंदवला आहे. सिंधुदुर्गातील पंचायत समिती गणांमधून शिवसेनेचे २८ उमेदवार विजयी झाले. रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी ४८ उमेदवार निवडणुकीत होते त्यापैकी तब्बल ४१ उमेदवार विजयी झाले तर पंचायत समित्यांमध्ये ७५ उमेदवार विजयी झाले. रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे १९ उमेदवार विजयी झाले आहेत तर पंचायत समित्यांमध्ये ३८ उमेदवार विजयी झाले. मराठवाड्यातील परभणी जिल्हा परिषदेत ५ आणि पंचायत समितींमध्ये ६ उमेदवार विजयी झाले. छत्रपती संभाजी नगरात २१ जिल्हा परिषद गट आणि ५१ गणांमध्ये शिवसेनेचा विजय झाला. धाराशीवमध्ये १४ जिल्हा परिषद गटांमध्ये आणि ३३ पंचायत समिती गणांमध्ये शिवसेना विजयी झाली. लातूरमध्ये मात्र शिवसेनेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एका जागेवर समाधान मानावं लागलं. पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. सातारा जिल्हा परिषदेत शिवसेनेचे १६ उमेदवार विजयी झाले तर पंचायत समित्यांमध्ये २४ गणांमध्ये शिवसेनेचा विजय झाला. सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या ६ आणि पंचायत समित्यांमध्ये ७ जागांवर शिवसेनेचा विजय झाला. सांगली जिल्ह्यातही शिवसेनेने मुसंडी मारली असून खानापूर तालुक्यात एकहाती सत्ता मिळवली. सांगली जिल्हा परिषदेच्या ७ आणि पंचायत समित्यांमध्ये १९ गणांमध्ये शिवसेनेचा विजय झाला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ९ जागा शिवसेनेने जिंकल्या तसेच पंचायत समित्यांच्या २० गणांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. पुणे जिल्ह्यात ५ जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गणांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. याउलट उबाठा पक्षाची राज्यभरात पिछेहाट झाली आहे. शिवसेनेच्या तुलनेत उबाठाला १२ जिल्हा परिषदांमध्ये एक तृतीयांश देखील जागा मिळाल्या नाहीत. घरात बसून राजकारण करणाऱ्यांना जनतेने पुन्हा एकदा नाकारले. उबाठा आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ विधानसभा, नगरपालिका आणि महानगर पालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही उबाठा आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून घरात बसणाऱ्या उबाठाला मतदारांनी पुन्हा एकदा नाकारले. उबाठा कोकणपाठोपाठ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार झाली आहे. याउलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची आगेकूच सुरु आहे. शिवसेना आणि महायुतीच्या विकासाच्या अजेंड्याला जनतेने पसंती दिली.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!