सत्तेचा माज अन् मिंधे टोळीची संस्कृती!:पत्रकारांना दिलेल्या शिवीगाळीवरून खासदार संजय दिना पाटलांविरुद्ध ठाकरे गटासह विरोधक आक्रमक, थेट विधानसभेत पडसाद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून शिंदे गटात गेलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेल्या ‘बॉम्ब’च्या धमकीनंतर आता नवा गदारोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांनाच खासदार पाटील यांनी कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. या धक्कादायक प्रकाराचे पडसाद आता थेट महाराष्ट्र विधानसभेत उमटले असून, काँग्रेस आणि ठाकरे गटाने या मुजोर वर्तनाविरोधात सरकारला धारेवर धरले आहे. पत्रकारांना शिवीगाळ प्रकरण थेट विधानसभेत; विरोधक आक्रमक खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेल्या गैरवर्तनाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आज विधानसभेत याचे तीव्र पडसाद उमटले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना (उबाठा) आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत सरकारकडून तातडीने कारवाईची मागणी केली. “महाराष्ट्रात पत्रकारही सुरक्षित नाहीत” – नाना पटोले नाना पटोले यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले, “खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दिलेली धमकी संपूर्ण महाराष्ट्राने टीव्हीवर पाहिली आहे. जर राज्यात लोकप्रतिनिधीच पत्रकारांवर हल्ला करण्याची आणि त्यांना मारण्याची भाषा करत असतील, तर महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? इथे पत्रकारही सुरक्षित राहिलेले नाहीत.” या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेऊन तातडीने सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी पटोले यांनी केली. भास्कर जाधवांचा ‘पॉइंट ऑफ प्रोसिजर’ आणि सरकारवर प्रहार आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात पॉइंट ऑफ प्रोसिजर उपस्थित करत थेट सरकारवर निशाणा साधला. विधान परिषदेतील उपसभापतींच्या निर्देशांचा संदर्भ देत ते म्हणाले, “हा दोन पक्षांमधील संघर्षाचा विषय नाही. हा सभागृहाच्या प्रतिष्ठेचा, परंपरेचा आणि घटनात्मक अधिकारांचा प्रश्न आहे. एखाद्याला वाचवण्यासाठी विधिमंडळाचे अधिकार दुबळे केले जात आहेत.” भाषणाच्या शेवटी त्यांनी, “पत्रकारांना धमक्या देणाऱ्या आणि अश्लील शिवीगाळ करणाऱ्या मुजोर संजय दिना पाटील यांच्यावर सरकार कारवाई कधी करणार?” असा थेट सवाल उपस्थित केला. दरम्यान, विधान भवनाबाहेरही ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी संजय दिना पाटील आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. “सहा खासदार शिंदे गटात गेल्यानंतर आनंदोत्सव होण्याऐवजी शिवीगाळ आणि धमक्या समोर येत आहेत, असे विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, हीच ‘मिंधे टोळीची’ संस्कृती आहे. जर या खासदारात एवढाच दम असेल, तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि भाजप किंवा शिंदेंच्या चेहऱ्यावर पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी.” सभागृहाबाहेर भास्कर जाधव म्हणाले, “सत्ताधारी पक्षातील लोक काहीही बोलले तरी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. पोलिसांसमोर उभे राहून पत्रकारांना ‘मारेन’ सांगण्याची हिंमत त्यांना सत्तेच्या पाठबळामुळेच आली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था रसातळाला गेली आहे.” अंबादास दानवे म्हणाले, “सत्ता आणि संपत्तीचा माज अनेकांच्या डोक्यात गेला आहे. एखादा खासदार कोणत्या आधारावर बॉम्ब फेकण्याची किंवा बंदुकीने उडवण्याची भाषा करतो? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे.” काय आहे प्रकरण… ‘माझ्या विरोधात आंदोलन केले तर बॉम्ब टाकेन’ या आपल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण विचारण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर खासदार संजय दिना पाटील अचानक भडकले. त्यांनी कॅमेऱ्यासमोरच आपला तोल गमावला आणि पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. संतापाच्या भरात पाटील पत्रकारांना धमकावत म्हणाले, “अरे भाई, बस झालं ना आता! किती अती करताय? बंद करा कॅमेरा. मी खासदार आहे हे विसरून जाईन. इज्जत करतोय तर इज्जत राखा. उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका. मी तुम्हाला घराखाली थांबवतोय, जेवायला देतोय, आणि तुम्ही असे वागताय. आता जर पुन्हा मला विचारायला आलात, तर मार खाणार. मारून पाठवीन तुम्हाला. लिहून घ्या, रेकॉर्ड करा आणि सांगा कमिशनरला. काय कम्प्लेंट करायची ती करा!” ‘यूएपीए’ (UAPA) अंतर्गत अटकेची मागणी; संजय राऊतांचे पोलिसांना पत्र यापूर्वी, संजय दिना पाटील यांच्या जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त आणि विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. “पाकिस्तानवर बॉम्ब टाकण्यापूर्वी भारताला १०० वेळा विचार करावा लागतो, पण हे महाशय थेट बॉम्ब टाकण्याची भाषा करत आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा असून त्यांच्यावर ‘यूएपीए’ (UAPA) सारख्या कठोर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा,” असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. पाटलांनी ‘मी याआधी पाच लोकांना मारले आहे’ असा दावा केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि पाटलांची सारवासारव या संपूर्ण वादावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा-सुव्यवस्थेची बाजू घेत स्पष्ट केले की, “राज्यात आम्ही कुणाचेही घर बॉम्बने उडवून देऊ देणार नाही. पोकळ धमक्यांना कोणीही घाबरण्याचे कारण नाही. जर कोणी अशा धमक्या देत असेल, तर त्याला पोलिस योग्य ते उत्तर देतील.” दुसरीकडे, आपल्या विधानावर सारवासारव करताना संजय दिना पाटील म्हणाले की, “माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. मी ‘जन्मायच्या अगोदर असं एकदा झालं होतं, तेव्हा ५ लोक मेले होते’ असे म्हणालो होतो.” मात्र, हे स्पष्टीकरण देतानाच त्यांनी पत्रकारांना केलेल्या अश्लील शिवीगाळीमुळे आता ते पूर्णपणे कोंडीत सापडले असून विधानसभेतूनही त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. संबंधित बातम्या वाचा… सत्तेत जाताच मग्रुरी:फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी; म्हणाले- कॅमेरा बंद करा, नाहीतर मारून पाठवीन VIDEO
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संजय दिना पाटील यांनी शिवसैनिकांना ‘बॉम्ब टाकून, घरात घुसून मारण्याची’ धमकी दिल्यावरून शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून, त्यांनी पोलिस आयुक्तांकडे पाटलांच्या अटकेची मागणी केली आहे. मात्र, या प्रकरणावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांवरच खासदार संजय दिना पाटील यांचा तोल सुटला. त्यांनी कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी धमक्या देणाऱ्यांना सोडणार नाही:कोणाचेही घर उडवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमक्यांच्या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही धमकावणे किंवा कोणाचेही घर उडवण्यासारख्या धमक्या देणे सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पोलिसांना कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश असल्याचे सांगितले. येथे वाचा संपूर्ण बातमी विरोध केला तर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन: संजय पाटलांच्या धमकीवरून संजय राऊत आक्रमक, पोलिस आयुक्तांकडे केली अटकेची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांना धमक्या देणे, बॉम्ब टाकण्याची भाषा करणे आणि जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. ‘माझ्या नादाला लागू नका’ वक्तव्यावर आक्षेप संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून गेलेल्या खासदारांविरोधात राज्यभरात आंदोलने सुरू असताना संजय दिना पाटील यांनी आंदोलकांना गंभीर धमक्या दिल्या. “माझ्या नादाला लागू नका, नाहीतर हॉस्पिटलमध्ये किंवा स्मशानात पाठवीन,” अशा वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. सविस्तर वाचा

Leave a Comment

error: Content is protected !!