छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाजप आमदार संजय केनेकर यांच्या क्रांती चौकातील मध्यवस्तीत असलेल्या संपर्क कार्यालयात एका बॅगेत पिस्तुलासारखी वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. काल सायंकाळी अज्ञात व्यक्तीने ही बॅग कार्यालयात ठेवून दिल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. सुरुवातीला कुणाची तरी बॅग विसरली असावी, असा समज करून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ती तशीच ठेवली. मात्र सकाळपर्यंत कुणीही त्या बॅगेबाबत संपर्क साधला नाही. त्यामुळे संशय आल्याने बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये पिस्तुल आढळल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय केनेकर यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार कळवला. पोलिसांनी तातडीने कार्यालयात धाव घेत बॅग आणि त्यातील वस्तू ताब्यात घेतली. प्राथमिक तपासात संबंधित पिस्तुल ही एअरगन असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीदेखील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिले आहे. एअरगन कार्यालयात कशी आणि केव्हा आणली गेली, ती कोणाची आहे आणि तिचा उद्देश काय असू शकतो, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकारी पंकज अतुलकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आमदार संजय केनेकर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू झाले आहे. बॅग कार्यालयात नेमक्या कोणत्या वेळी ठेवण्यात आली, ती ठेवणारी व्यक्ती कोण होती आणि ती कोणत्या दिशेने निघून गेली, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कार्यालयात ये-जा करणाऱ्या व्यक्तींची नोंद आणि संबंधित कागदपत्रांची छाननी करून पुढील तपासाची दिशा ठरवली जाणार आहे. पोलिसांनी घटनास्थळाची सखोल पाहणी केली असून एअरगनची तांत्रिक तपासणीही सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत कोणताही गोळीबार झाल्याचे संकेत आढळलेले नाहीत. तरीसुद्धा ही बाब केवळ विसरलेली बॅग होती की यामागे काही वेगळा हेतू होता, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, बॅग कुणी आणली, कशासाठी आणली आणि ती इथे का ठेवली गेली, याची सखोल चौकशी केली जाईल. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. घातपाताची शक्यता नाकारता येत नाही – केनेकर दरम्यान, आमदार संजय केनेकर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांनी लव्ह जिहादसह अनेक हिंदुत्ववादी मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेतली आहे. प्रचारसभांमध्येही त्यांनी कठोर टीका केली असून त्यानंतर अनेक वेळा उघडपणे धमक्या मिळाल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या घटनेमागे घातपाताची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, असे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या पोलिसांनी एअरगन आणि बॅग ताब्यात घेतली असून तपास सुरू आहे. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सर्व बाबींची खातरजमा केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. संपर्क कार्यालयात आढळलेल्या एअरगनमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. पुढील तपासातून बॅग ठेवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटते का आणि या घटनेमागील कारण स्पष्ट होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
