“मांगी”च्या पाण्यासाठी रोखला रस्ता‎:पावसाळी अधिवेशनानंतर बैठक घेऊन तोडगा काढू

करमाळा तालुक्यातील मांगी तलावातील पाणी हळगाव (ता. जामखेड) येथील कृषी विद्यापीठाला देण्याच्या शासन निर्णयाविरोधात सोमवारी मांगी येथे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. शासनाने काढलेला जीआर तत्काळ रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणाही दिल्या. मांगी तलावातील पाण्याचा एक थेंबही बाहेर जाऊ देणार नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रसंगी रक्त सांडावे लागले तरी चालेल, मात्र तलावातील पाणी वळवण्याचा निर्णय मान्य केला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. शेतकऱ्यांच्या मते, शासनाने सर्वप्रथम कुकडी प्रकल्पातून मांगी तलावात कायमस्वरूपी एक टीएमसी पाणी आणण्याचे प्रयत्न करावेत. कुकडीचे पाणी तलावात सोडून स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या गरजा पूर्ण केल्यानंतरच इतर कोणत्याही योजनेचा विचार करावा. मांगी तलावातील पाणी हळगाव कृषी विद्यापीठासाठी देण्यात येणाऱ्या निर्णयाचा आंदोलकांनी जाहीर निषेध केला. या वेळी शासनाच्या वतीने पाटबंधारे विभागाचे उपअभियंता राजगुरू, नायब तहसीलदार विजय जाधव, पोलिस अधिकारी व पोलिस प्रशासन उपस्थित होते. तसेच मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, सुजित बागल, अजय बागल, संतोष वारे, शिवशंकर जगदाळे, भरत अवताडे, प्रशांत बागल यांच्यासह मांगी पंचक्रोशीतील हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. मांगी परिसरातील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे कुकडी प्रकल्पातून दरवर्षी कायमस्वरूपी एक टीएमसी पाणी मांगी तलावात सोडण्यात यावे. तसेच हळगावसाठी मंजूर करण्यात आलेल्या पाइपलाइन प्रकल्पाचा फेरविचार करावा, हळगावला जाण्यासाठी चालू करण्यात येणारी पाइपलाइन आम्ही होऊ देणार नाही. पावसाळी अधिवेशनानंतर सर्व संबंधित शेतकरी, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन पाणी प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मी नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्व संबंधितांना बोलावून बैठक घेऊ आणि हा प्रश्न मार्गी लावू. – जयकुमार गोरे, पालकमंत्री

Leave a Comment

error: Content is protected !!