सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या निधनामुळे आमचा आधारवड कोसळल्याची भावना व्यक्त केली. अजित पवारांच्या शोक प्रस्तावाला पाठिबा देण्याची वेळ येईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. ते इथेच कुठे तरी आहेत असे वाटते. पण आज ते नाहीत हे वस्तुस्थिती आहे. त्यांच्या रुपाने आम्हा सर्वांचा आधारवड उन्मळून पडला आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अजित पवारांचा शोकप्रस्ताव मांडला. त्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, अजित पवारांच्या शोक प्रस्तावाला पाठिंबा द्यायची वेळ येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. अजूनही वाटते की, इथेच कुठेतरी त्यांचा वावर आहे. ते आपल्या ऑफिसमध्ये बसले असतील. काही चर्चा सुरू असेल. काहीतरी काम करत असतील. परंतु दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे छत्र त्यांच्या डोक्यावरून हरपले होते. त्यामुळे ते अडीअडचणींना तोंड देत मोठे झाले. शरद पवारांच्या देखरेखीत त्यांनी सामाजिक व राजकारणाचे धडे घेतले. सहकाराचेही धडे घेतले. या सर्वात त्यांनी प्राविण्य मिळवले. अजित पवारांचे फोटो डोळ्यापुढून जात नाहीत ते पुढे म्हणाले, अजित पवारांच्या जाण्याची बातमी अत्यंत धक्कादायक होती. मी पेपर वाचत बसलो होतो. तेव्हा समीर (समीर भुजबळ) आला आणि म्हणाला अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला. मी विचारले, मग दादा कुठे आहेत? तो म्हणाला, इस्पितळात आहेत. मी गाडी काढायला सांगितली. त्यानंतर तो परत दोन मिनिटांनी आला आणि दादांच्या मृत्यूची बातमी दिली. माझा त्यावर अजूनही विश्वास बसत नाही. एवढा मोठा धक्का क्वचितच बसला असेल. जन्मलेला आलेला प्रत्येक मनुष्य जाणार आहे. पण आपल्या काही कल्पना असतात. त्या वयाच्या, आजारपणाच्या असतात. संबंधित व्यक्ती अडचणीत आहे हे आपल्याला अगोदरच माहिती असते. पण दादांच्या बाबतीत वेगळेच ऐकायला मिळाले. मी अपघातस्थळी गेलो होतो. ते पाहून मनात धस्स झाले. अजित पवारांचे फोटो अजून डोळ्यापुढून जात नाहीत. छिन्नविच्छिन्न झालेला दादा… प्रत्येकाची जाण्याची एक वेळ आहे. पण अशा पद्धतीने दादा जावा हे पटत नाही. दादा अचानक डाव मोडून गेला छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार केंद्रातून राज्यात मुख्यमंत्री म्हणून परत आले तेव्हा अजित पवारांची व माझी ओळख झाली. तेव्हा माझ्याकडे हौसिंग खात्याची जबाबदारी होती. अजित पवार व अशोक चव्हाण त्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. तेव्हापासून माझी व त्यांची ओळख होती. पण शरद पवारांची जी काम करण्याची व लोकं जोडण्याची पद्धत होती, तीच पद्धत अजित पवारांची होती. अजित पवार विरोधी पक्षांना शत्रू मानत नव्हते. आपले त्यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत असे ते मानत होते. त्यांनी सर्वांना मदत केली. ते एक ना एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे आम्हाला वाटत होते. ते आमचे स्वप्न होते. राजकारणात काहीही घडू शकते. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातही हीच भावना होती. अचानक दादा डाव मोडून गेला. सर्व सोडून गेला. त्यांच्या कामाविषयी बरेच जण बोलले. त्यांच्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, स्वच्छता होती. अशा सर्व गुणांचे एकत्रीकरण दादांमध्ये होते. त्यांना घरातही चिटोरा पडल्याचे आवडत नव्हते. आमचा आधारवड कोसळला छगन भुजबळ यांनी यावेळी अजित पवारांच्या मृत्यूमुळे आपला आधारवर कोसळल्याचीही भावना व्यक्त केली. ते म्हणाले, राजकारणात बोलण्याच्या ओघात काही शब्द जातात. पण दादांच्या बाबतीत असे काही घडले तर ते तत्काळ क्षमाही मागत. चूक कबूल करायचे. ते रेटून नेत नव्हते. मी फार बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाचे खूपी चांगले वर्णन केले. पण एक आधारवड असतो. त्या आधारवडाखाली अनेक लोक उभे असतात. सावली घेतात. पाऊस पडत असेल तर पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करतात. तो आधारवड किती मोठा असतो हे आपल्या लक्षात येत नाही. पण तो आधारवर उन्मळून पडतो तेव्हा आपल्या लक्षात येते, अरे याच्या फांद्या किती, याची मुळे किती, हा आधारवड किती मोठा होता. दादांच्या बाबतीत अशीच भावना आमच्या सर्वांच्या मनात आहे. अजित पवारांच्या रुपात आमच्यात एक फार मोठा आधारवड होता. आज आम्ही त्यांना मुकलो. मी मनापासून त्यांच्या शोकप्रस्तावाला पाठिंबा देतो, असे छगन भुजबळ म्हणाले.
