Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

विमान दुर्घटनेला शरद पवारांनी अपघात का म्हटले?:भास्कर जाधव म्हणाले – बारामतीतील ठिणगीने महाराष्ट्र होरपळू नये म्हणून पवारांनी सावरले

“अजित पवार यांचा विमान अपघात झाला, हे मानायला महाराष्ट्रातील एकाही सर्वसामान्य माणसाचे मन तयार नाही. तो अपघात नसून घातपातच आहे, असा दाट संशय प्रत्येकाच्या मनात आहे. बारामतीमध्ये त्या दिवशी लोकांच्या मनात जी चीड होती, तिचे रूपांतर वणव्यात होऊ नये आणि महाराष्ट्र होरपळू नये, यासाठीच शरद पवारांनी तो ‘अपघात’ असल्याचे विधान केले होते,” असा खुलासा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज विधानसभेच्या सभागृहात केला. अजितदादांचा घात झाला की अपघात, हे मुख्यमंत्र्यांनी शोधून काढावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गत २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आला. एकीकडे आमदार रोहित पवार अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी भांडत आहेत, तर दुसरीकडे शरद पवारांनी पहिल्याच दिवशी या घटनेला अपघात म्हटले होते. या विसंगतीवर स्पष्टीकरण देताना, तसेच अजित पवारांविषयी आठवणी सांगताना भास्कर जाधव भावूक झाले होते. नेमके काय म्हणाले भास्कर जाधव? अजित पवारांच्या विमान अपघातविषयी महाराष्ट्राच्या मनात संशय आहे. दादांचा अपघात झाला हे मानायला सर्वसामान्य जनतेचे मन तयार नाही. तुमचे आणि माझेही मन हे मानायला तयार नाही. कुठेतरी घातपात झालाय असे वाटते. त्यामुळे सीबीआय, सीआयडी, डीसीजीआय मार्फत चौकशी करा. काय आणि कशी चौकशी करायची ती करा. काय झाले काय नाही हे चौकशीअंती बाहेर येईल, अशी मागणी भास्कर जाधव यांनी विधानसभेत बोलताना केली. शरद पवार आणि रोहित पवारांच्या भूमिकेतील ‘सत्य’ आमदार रोहित पवार विमान अपघाताच्या चौकशीसाठी भांडत आहेत, तर दुसरीकडे शरद पवारांनी याला अपघात म्हटले होते. या विसंगतीवर स्पष्टीकरण देताना जाधव म्हणाले की, आमचे सदस्य रोहित पवार त्यासंदर्भात भांडत आहेत. पण ते भांडत असताना दुसरी पण चर्चा घडत आहे. ती घडू नये म्हणून मी हा मुद्दा उपस्थित करतोय. त्या दिवशी शरद पवारांनी सांगितले की, हा घातपात नाही, तर अपघातच होता. म्हणून रोहित पवार वेगळे बोलतात आणि शरद पवार वेगळे बोलतात, असा त्याला अर्थ लागता कामा नये. “शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याने त्यावेळची परिस्थिती पाहून ते विधान केले होते. कारण त्या दिवशी मी बारामतीतील दृश्य बघितले. अख्ख महाराष्ट्र बारामतीकडे लोटला होता. माणसे ओळखणारी अनेक असतात आणि प्रत्येकाच्या मनात संपूर्णपणे एक चीड होती. कुठेतरी काहीतरी वाईट घडलंय. कुठेतरी ही दुर्घटना घडली की घडवली गेली? अशा पद्धतीचा संशय प्रत्येकाच्या मनात होता. शरद पवारांसारखा एक अनुभवी माणूस की कोणत्या वेळेला कोणते विधान करायचे हे त्यांना माहीत होते. ते विधान करतानाची पवार साहेबांची तुम्ही ती छबी समोर आणा. त्यांनी हातात कागद घेतला होता. मान खाली होती आणि एकच वाक्य ते बोलले की, हा घातपात नाही, हा अपघात आहे. का आणि कशाकरता बोलले? एक जर बारामतीमध्ये ठिणगी पडली असती, तर अख्खा महाराष्ट्र त्या ठिणगीने होरपळून निघाला असता. संपूर्ण महाराष्ट्रात हे लोन पोहोचले असते आणि सरकारने कितीही ताकद लावली आणि कोणीही लावली असती, तरी त्याला कंट्रोल कोणालाही शक्य झाले नसते. म्हणून त्यावेळचे शरद पवारांचे विधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत समोचित वाटते. मी त्यावर काही भाष्य केले नाही. पण आज हे भाष्य करणे मला उचित वाटतं आणि म्हणून रोहित पवार आणि शरद पवार मांडतात ही भूमिका विसंगत नाही. तर त्या त्या वेळची परिस्थिती आपण नजरेसमोर आणली पाहिजे, असे भास्कार जाधव म्हणाले. अजितदादा म्हणजे महाराष्ट्राच आधारवड होते भास्कर जाधव म्हणाले, अजितदाद म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा आधारवड होता. प्रत्येकाला दादा म्हणजे आधार वाटत होता. तो पक्ष कुठला, जात कुठली, तो धर्म-पंथ कुठला, त्यांच्या बाजूचा आहे की त्यांच्या विरोधात आहे. त्यांच्यावर आरोप केला की टीका केली. त्यांना दोष दिला की काय केले, याचा विचार न करता काम करून घ्यायचे असेल, तर दादांच्या दालनात जावे अशापद्धतीचा विचार आणि सर्वसामान्य आणि गरजू माणसाला आधार वाटणारा आधारवड म्हणजे अजितदादा होता. आज महाराष्ट्राचा आधारवड कोसळून पडला. महाराष्ट्राचे तळपते ‘ब्रह्मकमळ’ करपले अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना भास्कर जाधव भावूक झाले होते. त्यांनी दादांचे वर्णन करताना म्हटले की, ब्रह्मकमळ हे रात्री उमलते, पण महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा नावाचे ब्रह्मकमळ भर मध्यान्ही तेजाने तळपत होते. कोणाची नजर लागली माहीत नाही, पण हे उमललेले ब्रह्मकमळ अचानक करपून नाश पावले. हे केवळ पवार कुटुंबीयांचे किंवा त्यांच्या पक्षाचे नुकसान झाले नाही, तर समस्त महाराष्ट्राचे नुकसान झाले. आज सुनेत्रा पवारांच्या नजरेला नजर मिळवण्याचे माझे धाडस होत नाहीये. पण आता सभागृहात समोर बसणारे दादा दिसणार नाहीत. विरोधकांना मदत न करण्याचे सरकारचे धोरण भास्कर जाधव यांनी अजित पवार २०२२ मध्ये सत्तेत सामील झाल्यानंतरची एक आठवण सांगताना सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. २०२२ साली अजितदादा सत्तेत सामील झाले आणि सत्तेत सामील झाल्यानंतर मला नेहमीप्रमाणे जेवणाचा निरोप आला. मी जेवायला गेलो. जाताना माझे कागद घेऊन गेलो. उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारमध्ये आमच्या मंजूर झालेल्या बजेटच्या कामांना तत्कालिन सरकारने स्टे दिला होता. दादा पुन्हा मंत्रिपदी गेले आणि आमच्या आशा पल्लवीत झाल्या. मी कागद घेऊन गेलो, सगळे मंजूर असलेले पुरावे दादांच्या हातात दिले. दादांनी सांगितले, काळजी करू नकोस. बजेटमध्ये मीच तरतूद केलेली आहे. मी यावरील स्टे ताबडतोब उठवून देतो. दुसऱ्या दिवशी चिठ्ठी लिहून मला बोलावले आणि सांगितले की, मी तुमच्या बाबतीत काही मदत करू शकत नाही. कारण सरकारचे धोरण असे ठरलंय की, विरोधी पक्षाला मदत करायची नाही. नंतर मी कोर्टात जाऊन सगळा स्टे उठवला, असा दावा भास्कर जाधव यांनी केला.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!