अजित पवार यांच्या विमान अपघातात ‘ब्लॅक बॉक्स’ जळून खाक झाला, याचे सर्वाधिक आश्चर्य वाटत आहे. अत्यंत भीषण आगीतही सुरक्षित राहील अशा तंत्रज्ञानाने बनलेला ब्लॅक बॉक्स जळतोच कसा? त्यामुळे माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला शंका येईलच,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला धारेवर धरले. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकांमध्ये तथ्य असल्याचे सांगत आव्हाड यांनी विमानाची कंपनी, त्याचे उड्डाण तास आणि डीजीसीएच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघातात ब्लॅक बॉक्स जळाल्यावरून शंका उपस्थित केली. ते म्हणाले, अजित पवारांच्या विमान अपघातात ब्लॅक बॉक्स जळून गेला, याचे सर्वाधिक आश्चर्य वाटत आहे. ११ हजार सेल्सिअस आगीच्या दाहामध्ये ब्लॅकबॉक्सला काही होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना, तो जळून गेल्याचे सरळ सांगितले जाते. त्यामुळे माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला शंका येईलच की, ब्लॅक बॉक्स कसा जळू शकतो? त्यामुळे रोहित पवार करत असलेल्या मागण्यांमध्ये तथ्य आहे. रोहित पवार योग्य लाईनवर चाललेत जितेंद्र आव्हाड म्हणाले, कंपनी कोणाची आहे? कंपनीत पैसे कोणाचे लावलेत? ते विमान किती तास उडले होते? त्याला तेवढे तास उडवण्याची परवानगी होती का? डीजीसीए काही कव्हर करायला बघतंय का? डीजीसीएचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत? ती कंपनी कुठल्या पक्षाच्या अधिपत्याखाली चालते? असे सगळे प्रश्न आता समोर आलेत. रोहित पवार ज्या लाईनवर चाललेत, ती योग्य आहे. ते बरेच संशोधन करत आहेत. विमानाला भारतात उडण्याची परवानगी नव्हती यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या विमानाबाबत मोठा दावा केला. अजित पवारांनी प्रवास केलेल्या विमानाची माहिती देतो की, त्या विमानाला भारतात उडण्याची परवानगीच नव्हती. ते विमान ५ हजार तासांच्या वर उडू नये, असे असताना ते विमान ८ हजार तासांच्यावर उडून झाले होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. चौकशीला जितका उशीर, तितका संशयाला वाव अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात अद्यापही प्राथमिक चौकशी अहवाल समोर येत नाहीये, त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, जेवढा चौकशीला उशीर करतील किंवा चौकशी लांबवतील, ब्लॅक बॉक्स जळून गेला अशा जेवढ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगतील, तेवढ्याच संशयाला वाव मिळण्यास जागा निर्माण होत आहे. ब्लॅक बॉक्स जळणे, हीच मोठी शंका अनेक जण शंका उपस्थित करत असले, तरी काही ठोस पुरावे असतील तर ते द्यावेत असे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ब्लॅक बॉक्स जळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका आहे. जगातील कुठल्याही अपघातात ब्लॅक बॉक्स जळून गेल्याचे कधीही सांगितले गेलेले नाही. त्यामुळे शंकेला जर चौकशीच्या माध्यमातून वाव मिळणार असेल, तर शंका उपस्थित होणारच. मुळात माणसाचा स्थायी स्वभाव संशयी असतो.” आव्हाड मविआच्या बैठकीला गैरहजर का? अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल विरोधकांची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला जितेंद्र आव्हाड उपस्थित नव्हते. याबाबत त्यांना विचारले असता माझा नव्हता असे उत्तर त्यांनी दिले. गेले काही दिवस मला बोलावे वाटत नव्हते. त्यामुळे मी बैठकीला नव्हतो, असेही त्यांनी सांगितले. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारला असता आव्हाड यांनी बोलणे टाळले. विलीनीकरणाबाबत मला काही बोलायचे नाही. कारण त्या संपूर्ण प्रक्रियेत माझा कधी समावेश केला नव्हता. जी गोष्ट मला माहितीच नाही. त्याबद्दल मी कशाला बोलू? असे ते म्हणाले.
