मेळघाटच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक:संघर्ष यात्रेदरम्यान आश्वासनांची काय स्थिती? ग्रामस्थांकडून घेताहेत माहिती‎

मेळघाटातील पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, वनहक्क आणि रस्त्यांच्या बिकट प्रश्नांसाठी दोन महिन्यांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी मेळघाट संघर्ष पदयात्रा काढली होती. मात्र, या पदयात्रेनंतरही मेळघाटातील अनेक मूलभूत प्रश्न अद्याप जसेच्या तसे कायम असल्याचा आरोप करत आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त जनसंपर्क अभियानांतर्गत शनिवारी त्यांनी धारणी व चिखलदरा तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून नागरिकांशी थेट संवाद साधला. दरम्यान, मेळघाटातील समस्या तातडीने निकाली न निघाल्यास आगामी दिवाळीत तीव्र आंदोलन छेडण्याचा कडक इशारा आमदार कडू यांनी यावेळी दिला.मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या धारणी तालुक्यातील मोगर्दा आणि चिखलदरा तालुक्यातील गडगाभांडूम या गावांना भेट देऊन आमदार बच्चू कडू यांनी सर्वप्रथम ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत करत पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सेवा, शिक्षण, दळणवळणासाठी रस्ते आणि रोजगाराशी संबंधित भेडसावणाऱ्या अनेक गंभीर समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. काही महिन्यांपूर्वी काढलेल्या मेळघाट संघर्ष यात्रेदरम्यान समोर आलेल्या प्रश्नांची सद्यस्थिती काय आहे, प्रशासनाने त्यापैकी कोणती कामे प्रत्यक्ष पूर्ण केली, कोणते प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत आणि नागरिकांच्या इतर कोणत्या नव्या अडचणी आहेत, याची सविस्तर माहिती बच्चू कडू गावकऱ्यांशी चर्चा करून घेत आहेत. गडगाभांडूम येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनी प्रशासकीय यंत्रणेवर जोरदार टीकास्त्र सोडले. “मेळघाट संघर्ष यात्रेनंतर आम्ही प्रशासनाला कामे करण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. मात्र, प्रशासनाची अनेक कामे आजही केवळ कागदावरच मर्यादित आहेत. अधिकारी फक्त बैठकांचे सत्र घेतात, अहवाल पाठवतात; परंतु सर्वसामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याची त्यांची इच्छाशक्ती अजिबात दिसत नाही. मेळघाटातील विकास रखडण्यास पूर्णपणे प्रशासनाची निष्क्रियताच कारणीभूत आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.या वेळी त्यांनी मेळघाटातील प्रलंबित वीज प्रश्नावरही तीव्र संताप व्यक्त केला. “देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली आहेत, देश प्रगतीच्या आणि तंत्रज्ञानाच्या नव्या उंचीवर पोहोचला आहे; मात्र अत्यंत खेदाची बाब म्हणजे मेळघाटातील काही गावे आजही अंधारात चाचपडत आहेत. अनेक वस्त्यांपर्यंत नियमित वीज पोहोचलेली नाही. हा विकासाचा प्रश्न नसून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा, अपयशाचा पुरावा आहे,” असे बच्चू कडू म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!