पाळधी संतांनी समाजाला अध्यात्म, सदाचार आणि मानवतेचा मार्ग दिला, तर शूरवीरांनी धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाचे रक्षण केले. संत आणि शौर्य परंपरेच्या संस्कारांमुळेच महाराष्ट्राची संस्कृती व अस्मिता आजही तेजस्वी आहे, असे मत संग्राम महाराज भंडारे यांनी आवर्जून व्यक्त केले आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा देताना संग्राम महाराजांनी पालकमंत्र्यांच्या संत, संस्कृती आणि समाजकार्याप्रती असलेल्या जिव्हाळ्याचाही गौरवपूर्ण उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी संतांच्या विचारांतून प्रेरणा घेत स्वराज्याची उभारणी केली. आजच्या नेतृत्वानेही संतविचार, नैतिक मूल्ये आणि लोकसेवेचा आदर्श स्वीकारण्याची गरज आहे. संग्राम महाराज भंडारे यांनी संत तुकोबारायांची पवित्र पगडी व आळंदी वर्णाचे उपरणे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांना भेट दिले. कीर्तन महोत्सव पाळधी येथील जीपीएस ग्रुप व जळगाव येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित राज्यस्तरीय या कीर्तन महोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.