आजच्या काळात पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक शिक्षण किती महत्त्वाचे आहे, याचे उत्तम उदाहरण लाखांदुर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेने घालून दिले आहे. खैरी (घर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या परसबागेत पिकवलेला भाजीपाला थेट आठवडी बाजारात विकून हजारो रुपयांची कमाई केली आहे. परसबागेतून उद्योजकतेकडे शाळेतील पोषण आहार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरातच परसबाग फुलवली होती. या बागेतून पोषण आहारासाठी आवश्यक भाजीपाला वापरल्यानंतर, उर्वरित मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वांगी, टोमॅटो, कोबी आणि मुळा यांसारख्या भाज्यांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. लाखांदुर तालुक्यातील मासळ येथील आठवडी बाजारात या बाल विद्यार्थ्यांनी आपल्या भाज्यांची छोटीशी दुकान थाटली. गणवेशात बसलेल्या या चिमुकल्या विक्रेत्यांकडे पाहून ग्राहकांमध्येही प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते. ‘केमिकलमुक्त’ आणि ‘ताज्या’ भाज्या असल्याने ग्राहकांनीही त्यांना भरघोस प्रतिसाद दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ भाजी विकली नाही, तर हिशोब करण्याची कला आत्मसात केली. यातून विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य शिकले. कष्टाचे महत्त्व आणि उद्योजकतेची पहिली पायरी अनुभवली. दिवसभराच्या या विक्रीतून विद्यार्थ्यांनी हजारो रुपयांचा नफा मिळवला. हा निधी शाळेच्या विकासकामांसाठी किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार असल्याचे समजते. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, “शिकणारा शेतकरी आणि स्वावलंबी विद्यार्थी” अशी नवी ओळख या मुलांनी निर्माण केली आहे. प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे शिक्षण महत्त्वाचे – सरपंच दुसरीकडे, खैरी (घर) च्या सरपंच सौ. वर्षा सेवक कोरे यांनी या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले शिक्षण आयुष्यभरासाठी उपयोगी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली आहे. केवळ वर्गात बसून शिक्षण मिळत नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून जे शिक्षण मिळते ते आयुष्यभरासाठी उपयोगी ठरते. आमच्या विद्यार्थ्यांनी आज ते सिद्ध केले, असे त्या म्हणाल्यात.
