वैरागमध्ये ठाकरे गटाचे ‘जोडे मारो आंदोलन’:शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी देण्याची मागणी; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा‎

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गद्दार खासदारांच्या निषेधार्थ “जोडे मारो आंदोलन” करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण व विनाअट कर्जमाफी देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी विनाअट कर्जमाफीचा शासन निर्णय (जीआर) तातडीने मंजूर करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे देवा दिंडोरे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी इशारा देताना सांगितले की, अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर न झाल्यास सर्वपक्षीय शेतकरी आंदोलन उभारण्यात येईल. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेस, शेतकरी संघटना तसेच इतर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचा सहभाग असेल. या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. “शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो”, “शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या”, “गद्दार खासदारांचा धिक्कार असो” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, उपजिल्हा प्रमुख सुरेश दिंडोरे, माजी नगरसेवक बापू जाधव, बाळासाहेब मुळे, वैराग शहरप्रमुख संतोष गणेचारी, जितेंद्र भोसले, बाळासाहेब गटकुळे, कार्यकर्ते, शेतकरी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. बार्शी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये त्यांना विरोध केला जाईल, असा इशारा देण्यात आला. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात घोषणाबाजी

Leave a Comment

error: Content is protected !!