Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

विजय वडेट्टीवारांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव:कंबोडिया किडनी प्रकरणावरून भाजप आमदार योगेश सागर आक्रमक, सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याच्या घटनेने राज्य हादरले असतानाच, आता या प्रकरणावरून विधानसभेत राजकीय रणकंदन माजले आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात चुकीची आकडेवारी देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप करत, भाजप आमदार योगेश सागर यांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याला खाजगी सावकाराने कर्जाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्याला कंबोडियाला नेऊन त्याची किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक प्रकार दोन महिन्यांपूर्वी समोर आला होता. यासंदर्भात आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेदरम्यान विजय वडेट्टीवार यांनी दावा केला की, तब्बल 19 शेतकऱ्यांनी अशा प्रकारे आपल्या किडन्या विकल्या आहेत. ‘नरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न- योगेश सागर भाजप आमदार योगेश सागर यांनी वडेट्टीवारांच्या या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. सागर म्हणाले की, मंत्री महोदयांनी सभागृहात दोनवेळा स्पष्ट केले होते की हा 19 शेतकऱ्यांचा आकडा चुकीचा आहे. कंबोडिया प्रकरणात महाराष्ट्रातील केवळ दोन व्यक्ती होत्या, त्यापैकी दुर्दैवाने एक जण शेतकरी आहे. तरीही वडेट्टीवारांनी वारंवार 19 हा आकडा सांगून एक खोटा ‘नरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न केला. पद्मश्री पुरस्काराचा अपमान योगेश सागर यांनी वडेट्टीवारांच्या दुसऱ्या एका विधानावरही बोट ठेवले. वडेट्टीवार म्हणाले होते की, ज्या डॉक्टरांनी हे ऑपरेशन केले ते ‘पद्मश्री’ विजेते आहेत. यावर उत्तर देताना सागर म्हणाले, संबधित डॉक्टर पद्मश्री नाहीत. अशा प्रकारे चुकीची माहिती पसरवणे हा खऱ्या पद्मश्री विजेत्यांचा आणि या सर्वोच्च नागरी सन्मानाचा अपमान आहे. मंत्र्यांनी वारंवार दुरुस्ती करूनही वडेट्टीवारांनी खोटा आकडा रेटून धरला, ही सभागृहाची दिशाभूल आहे. महाराष्ट्राचा शेतकरी गरीब असेल, संकटात असेल, पण तो ‘किडनी विकणारा’ नाही. अशा विधानांमुळे शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली आहे. विजय वडेट्टीवार यांनी वारंवार सांगूनही आपल्या वक्तव्यात सुधारणा केली नाही, त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी योगेश सागर यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे आता आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!