राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार चरण वाघमारे यांनी एका पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे करत राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने अजित पवार यांचा मृत्यू आणि जिल्ह्यातील वाळू चोरीच्या नव्या प्रकरणावर भाष्य केले आहे. चरण वाघमारे यांनी दावा केला आहे की, अजित दादांचा झालेला विमान अपघात हा केवळ अपघात नसून तो एक पूर्वनियोजित घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या माहितीनुसार, रोहित पवार यांनी गेल्या महिनाभरापासून या संदर्भात पुरावे गोळा केले आहेत. काल रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला, असा आरोप वाघमारे यांनी केला आहे. याच कारणामुळे आज बारामती पोलीस स्टेशनमध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या आणि वकिलांच्या उपस्थितीत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ’सुपर एन्ट्री’ वाळू घोटाळा चरण वाघमारे यांनी जिल्ह्यातील वाळू चोरीच्या ‘सुपर एन्ट्री’ नावाच्या एका नवीन प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. रॉयल्टी न भरता छुप्या पद्धतीने ५ ब्रास ऐवजी १० ब्रास वाळूची वाहतूक केली जात आहे. यासाठी अधिकाऱ्यांना ‘सुपर एन्ट्री’च्या नावाखाली पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारला इशारा राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शासन ९ लाख ३५ हजार कोटींच्या कर्जात आहे. अशा परिस्थितीत अवैध वाळू वाहतुकीमुळे कोट्यवधींचा महसूल बुडून अधिकाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे गोपनीय तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही, असेही त्यांनी नमूद केले. रोहित पवार यांच्या आंदोलनाला आणि अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
