राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवांच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी अजित पवारांच्या कार्याचा सखोल आढावा घेत ते आपल्या कायम स्मरणात राहतील अशी भावना व्यक्त केली आहे. आज त्यांच्या उणीवेची वेदना मनाला सतत जाणवते, पण त्यांचे विचार, त्यांची कार्यतत्परता व राष्ट्रवादी परिवाला त्यांनी दिलेले बळ मला व आपल्या सर्वांना पुढे जाण्याची नवी प्रेरणा देत राहील, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. या घटनेला आज 1 महिना पूर्ण झाला. पण त्यांच्या मृत्यूविषयी व्यक्त करण्यात येणाऱ्या शंका-कुशंका थांबल्या नाहीत. सत्ताधारी व विरोधी बाकावरील अनेक आमदारांनी अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज एक व्हिडिओ पोस्ट करत ते आपल्या सर्वांच्या कायम स्मरणात राहतील अशी भावना व्यक्त केली आहे. काय म्हणाल्या सुनेत्रा पवार? सुनेत्रा पवार आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांची आठवण काढताना म्हणतात, जिवाभावाचा माणूस… माणुसकीची खोल जाण, काम करण्याची अखंड प्रामाणिक तळमळ आणि समाजासाठी झटण्याची अविरत वृत्ती, हेच अजितदादांचे खरे व्यक्तिमत्त्व होते. जनहितासाठी सत्ता वापरण्याची त्यांची ठाम भूमिका, दूरदृष्टीतून उभा केलेला विकासाचा मार्ग आणि कामातून कमावलेला जनतेचा अपार विश्वास, हेच त्यांच्या जीवनकार्याचे खरे विश्व होते. स्वभावाने दिलदार आणि आपुलकीने माणसं जोडणारे, तर निर्णयाच्या वेळी तितकेच रोखठोक आणि विकासाभिमुख नेतृत्व, अशी त्यांची वेगळी ओळख होती. प्रत्येक समाजघटकाला आधार देत त्यांनी सातत्याने “विकासाचे राजकारण” जपले. आज त्यांच्या उणीवेची वेदना मनाला सतत जाणवते; पण त्यांचे विचार, त्यांची कार्यतत्परता आणि राष्ट्रवादी परिवाराला त्यांनी दिलेले बळ मला आणि आपणा सर्वांना पुढे जाण्याची नवी प्रेरणा देत राहील. अजितदादा सदैव आपल्या स्मरणात.. आपल्या विचारांत, आपल्या कृतीत, आपल्या प्रत्येक कामात त्यांचे प्रतिबिंब कायम दिसत राहील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. व्हिडिओ ट्विटरवरून काढला का? सुनेत्रा पवार यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो काही वेळातच व्हायरल झाला. पण काही वेळाने हा व्हिडिओ ट्विटरवर दिसेनासा झाला. त्यामुळे हा व्हिडिओ सुनेत्रांनी डिलीट केला का? अशी चर्चा रंगली आहे. शिखर बँक घोटाळ्यात सुनेत्रा पवारांच्या अडचणी दूर दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससी बँक) या राज्याच्या शिखर सहकारी बँकेत कर्जांचे वितरण करताना सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपांच्या प्रकरणात दिवंगत अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना क्लीन चिट देणारा ‘सी-समरी’ अहवाल विशेष एसीबी न्यायालयाने शुक्रवारी स्वीकारला. यामुळे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्याचे प्रकरण कमकुवत होणार असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याही अडचणी दूर होण्याची चिन्हे आहेत. ईडीचा हस्तक्षेप अर्जही फेटाळला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी विशेष एसीबी न्यायालयाचा हा महत्त्वाचा निर्णय आला आहे. ‘गुन्हेगारी प्रकरण दिसत नाही’, असे निरीक्षण नोंदवत न्यायाधीश महेश जाधव यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा (ईओडब्ल्यू) ‘सी-समरी’ अहवाल स्वीकारला. तसेच या अहवालाच्या विरोधातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी आमदार माणिकराव जाधव, दिवंगत माजी मंत्री शालिनीताई पाटील यांच्यासह अनेकांनी केलेल्या जवळपास 30 ‘प्रोटेस्ट’ याचिका न्यायालयाने फेटाळल्या, शिवाय ईडीचा हस्तक्षेप अर्जही फेटाळला.
