पंतप्रधान मोदींचा अमेरिकेच्या तालावर मुजरा:प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात; मोदींमुळे भारताचे सार्वभौमत्व संकटात सापडल्याचा आरोप

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत. त्यांच्यामुळे भारताचे सार्वभौमत्व संकटात सापडले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीने काल मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राओला सरकारविरोधात निदर्शने आयोजित केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकर यांनी एका ट्विटद्वारे मोदींवर पुन्हा निशाणा साधला. ते म्हणाले, पीएम मोदींचे नाव एपस्टीन फाईलशी संबंधित ईमेलमध्ये येणे, अमेरिकेसोबत भारत-विरोधी आर्थिक व्यापार करणे व विनासोर्स कोडचे महागडे राफेल विमाने खरेदी करण्यातून आपले राष्ट्रीय सार्वभौमत्व, प्रशासन, धोरण स्वायत्तता, राष्ट्रीय सुरक्षा व पंतप्रधानांच्या नेतृत्व क्षमतेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. त्यातून मोदींचे नेतृत्व कॉम्प्रोमाईज्ड असल्याचे स्पष्ट होते. स्पष्ट शब्दांत सांगायचे तर मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत. काल मुंबईत वंचित बहुजन आघाडीने मोदींविरोधातील जनतेच्या संतापाचा पाया घातला. तसेच मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत असल्याचा आरोप केला. वंचित बहुजन आघाडीची उपस्थिती सध्या मर्यादित असली तरी, राष्ट्रीय पक्षांनी विशेषतः काँग्रेसने आमच्याकडून धडा घेतला पाहिजे. मागील 12 वर्षांत या राष्ट्रीय पक्षांना जे जमले नाही, ते आम्ही करण्याचे व मोठ्या आवाजात बोलण्याचे धाडस दाखवले आहे. गतवर्षी औरंगाबादेत (छत्रपती संभाजीनगर) वंचिने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात एक मोठा मोर्चा काढला. त्यामुळे त्यांना जबर झटका बसला. कालच्या वंचितच्या आंदोलनानेही मोदींविरोधातील जनतेच्या संतापाचा पाया रचला गेला. या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व नागरीक, स्वयंसेवी संस्था व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा मोदी अमेरिकेच्या तालावर नाच असल्याचा आरोप करतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मोदींच्या 2 रिल्स एप्रिलपर्यंत बाहेर काढणार देशातील 35 टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली जगते. भारताचा अमेरिकेसोबतचा करारनामा आणि नरेंद्र मोदीचे काही महिन्यांपूर्वीचे भाषणं यात मोठी तफावत आहे. एपस्टिन फाईलमध्ये नाव आल्यानंतर मोदीने देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे, असा आरोपही आंबेडकरांनी या प्रकरणी केला आहे. यावेळी त्यांनी मोदींच्या 2 रिल्स एप्रिलपर्यंत बाहेर काढण्याचा इशाराही दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिलपर्यंत थांबा. तुमच्या दोन रिल्स बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. त्या रिल्स येऊ द्यायच्या नसतील तर नरेंद्र मोदी यांनी खुर्ची खाली करावी. भाजपने भारताचे सार्वभौम टिकवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पायउतार करावे लागेल, असे ते म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!