सिंधी शिवारातील पाच खांबांवरील तार लंपास; महावितरणचे 60 हजारांचे नुकसान
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव तालुक्यातील सिंधी शिवारात पुन्हा एकदा वीजतारा चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून अज्ञात चोरट्यांनी थेट पाच विद्युत लघुदाब खांबांवरील तार कापून लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमुळे महावितरणचे सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता निलेश रामदास काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 30 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी चारचाकी वाहनाच्या सहाय्याने सिंधी शिवारातील नरेंद्र सपाट व इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पाच वीज खांबांवरील विद्युत तार कापून चोरी केली.
दि. 12 मे रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता गट क्रमांक 177, 178, 178/1 व 178/2 मधील खांबांवरील तार गायब असल्याचे निदर्शनास आले.ग्रामीण भागात वाढत्या वीजतारा चोरीमुळे महावितरणसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. परिणामी शेतीपंप बंद पडून कृषी कामांवर परिणाम होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी वीजतारा चोरी करणाऱ्या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता किनाके करीत आहेत