एकतर्फी प्रेमातून १५ वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला. आरोपीला पाच हजार रुपये दंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. शुभम ऊर्फऋषिकेश बाजीराव भागवत (वय २२) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना १२ ऑक्टोबर २०२१ रोजी बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे घडली होती. मृत मुलगी आठवीत शिकत होती. मुलीने प्रेमास नकार दिल्याने आणि फोनवर बोलणे टाळल्याच्या रागातून आरोपीने तिच्यावर चाकूने २२ वेळा वार केले. तक्रारीनुसार, आरोपीने मुलीचा गळा चिरून तिचे धड शरीरापासून वेगळे केले होते, अशी माहिती बिबवेवाडी पोलिसांनी दिली. मुलीच्या चुलत बहिणीने या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विशेष सरकारी वकील ॲड. हेमंत झंजाड यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, “हा दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा आहे. या प्रकरणात एकूण १२ साक्षीदारांनी साक्ष नोंदवली. त्यापैकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपीला न्यायालयात ओळखले आणि निर्भीडपणे साक्ष दिली. मृत मुलगी तिच्या आईवडिलांचे एकुलते एक अपत्य होती.” न्यायाधीशांनी आपल्या निरीक्षणात म्हटले की, हा खटला दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरणांच्या श्रेणीत येईल असे मानणे कठीण आहे, परंतु सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार हा गुन्हा क्रूर होता. शवविच्छेदन अहवालानुसार, मुलीच्या मृतदेहावर २५ छेदलेल्या जखमा आढळल्या होत्या. या गुन्ह्यासाठी मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा अशा दोनच तरतुदी आहेत. जन्मठेप हा नियम आहे आणि मृत्युदंड हा अपवाद आहे. मृत्युदंडाची शिक्षा देऊन हे अपवादात्मक प्रकरण म्हणून घोषित करणे न्यायिक मनाला पटत नाही. त्यामुळे जन्मठेपेची शिक्षा ही आरोपीसाठी योग्य शिक्षा आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
