काँग्रेसचा भाजपाच्या प्रज्ञा सातवांना डिवचण्याचा प्रयत्न?:काँग्रेसच्या आंदोलनाला कळमनुरीतून झालेली सुरुवात राजकीय वर्तुळात बनली चर्चेचा विषय

शेतकऱ्यांसह विविध प्रश्‍नांवर काँग्रेसने कळमनुरी येथून सुरु केलेले आंदोलन भाजपाच्या डॉ. प्रज्ञा सातव यांना डिवचण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे हे आंदोलन जिल्हयातील राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. राज्यात काँग्रेसपक्षाकडून महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून केंद्रातील व राज्यातील सरकारवर कडाडून टिका केली आहे. शासनाच्या शेतकरी, कष्टकरी जनतेच्या विरोधीतील निर्णय तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. सदर आंदोलन राज्यभरात ठिकठिकाणी केले जाणार असले तरी या आंदोलनाची सुरवात कळमनुरी येथून झाली यामुळे राजकिय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीयनेते नेते दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना काँग्रेस पक्षाने दोन वेळेस विधान परिषदेवर संधी दिली. मात्र दुसऱ्या वेळी पक्षांतर्गत विरोध असतांनाही थेट दिल्ली येथूनच त्यांचे नांव सुचविण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच हतबल झाल्याचे चित्र होते. त्यानंतर उसने आवसान आणून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र विधान परिषदेची संधी दुसऱ्यांदा पदरात पाडून घेतल्यानंतर डॉ. सातव यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला होता. दरम्यान, आता काँग्रेस पक्षाने कळमनुरी येथूनच सरकारच्या विरोधात सुरु केलेल्े आंदोलन भाजपाच्या डॉ. सातव यांना डिवचण्यासाठी केले होते काय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. काँग्रेसने सातव घराण्याला भरभरून दिले असतांनाही डॉ. सातव यांनी घेतलेली पक्ष बदलाची भुमीका काँग्रेस नेत्यांना आवडली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेेच कळमनुरी येथून हि पदयात्रा सुरु केल्याचेही बोलले जात आहे. यासंदर्भात काँग्रेसचे जिल्हा प्रभारी साहेबराव कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, संपूर्ण राज्यात या पदयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. आमचे नेते दिवंगत माजी खासदार ॲड. राजीव सातव यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न लोकसभेत मांडून त्यांची सोडवणुक करून घेतली. त्यांची कर्मभुमी म्हणून कळमनुरी येथून या आंदोलनाला सुरवात केली आहे. तर यावेळी दिवंगत ॲड. राजीव सातव यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याचेही त्यांनी सांगितले. डिवचण्याचा प्रकार नाही – डॉ. प्रज्ञा सातव, माजी विधान परिषद सदस्या काँग्रेसने पदयात्रा आंदोलन कळमनुरीतून सुुरु केले आहे. त्यांच्या पक्षाकडून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची सुरवात कळमनुरीतून करणे म्हणजे आपणास डिवचण्याचा प्रयत्न वैगैरे काही नाही. त्यांनी माजी खासदार ॲड. सातव यांच्या समाधीचे दर्शन घेतले असेल तर चांगली गोष्ट आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!