उद्धव ठाकरेंना मदत हवी असल्यास त्यांनी एकनाथ शिंदेंशी संपर्क करावा:शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा

सध्या राज्याच्या राजकारणात विधान परिषदेच्या सदस्यत्वावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्य म्हणून असलेला कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे ते पुन्हा विधान परिषदेत येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. ठाकरे गटाकडून मात्र उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी या मुद्द्यावरून ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना एक उपरोधिक सल्ला दिला आहे. नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या आमदारकीच्या विषयावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, दिल्लीसमोर नाराजी व्यक्त करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करावा. शिंदे हे मोठ्या मनाचे नेते आहेत आणि जर त्यांना फोन केला तर ते तुमच्या पाठीशी उभे राहतील, असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी दिल्लीकडे धाव घेण्यापेक्षा शिंदेंशी संवाद साधावा, असा सल्लाही त्यांनी दिला. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. याचवेळी म्हस्के यांनी राज्यसभा निवडणुकीचाही संदर्भ देत ठाकरे गटावर निशाणा साधला. त्यांच्या मते, राज्यसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून उमेदवार न देण्यामागे वेगळीच भीती होती. पक्षातील काही आमदार फुटण्याची शक्यता असल्यानेच त्यांनी उमेदवार उभा केला नाही, असा दावा त्यांनी केला. जर उमेदवार दिला असता तर तो निवडून आला नसता, असेही ते म्हणाले. या विधानामुळे राज्यसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांवरही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सध्या विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यस्त असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ सध्या थंड असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र पुढे काय घडेल हे पाहावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. आगे आगे देखो होता है क्या, असे म्हणत त्यांनी भविष्यातील राजकीय हालचालींचा संकेत दिला. या वक्तव्यामुळे पुढील काही महिन्यांत राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरेंचे पुढील राजकीय भविष्य दरम्यान, मे मध्ये विधान परिषदेच्या एकूण नऊ जागा रिक्त होणार आहेत. मात्र सध्याच्या विधानसभा संख्याबळाचा विचार करता महाविकास आघाडीला या नऊपैकी केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही एकमेव जागा उद्धव ठाकरे यांना मिळावी यासाठी ठाकरे गट आग्रही आहे. मात्र या जागेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि काँग्रेसची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतविभाजन टाळण्यासाठी आघाडीत कोणती तडजोड होते आणि त्यातून कोणता निर्णय घेतला जातो, यावरच उद्धव ठाकरेंचे पुढील राजकीय भविष्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार असल्याचे मानले जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!