महाराष्ट्र केसरी 2026 चा रणसंग्राम!:’महाअंतिम’ सोहळा आज; सिकंदर शेख vs महेंद्र गायकवाडमध्ये ‘हायव्होल्टेज’ लढत पाहायला मिळणार

पुण्यातील वाघोली येथे रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेचा आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. अवघ्या काही तासांत महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळणार असून, या मानाच्या गदेवर कोण नाव कोरणार याकडे संपूर्ण कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे. यंदा माती विभागाच्या अंतिम फेरीत हिंगोलीचा ‘चपळ चिता’ सिकंदर शेख आणि सोलापूरचा ‘बाहुबली’ महेंद्र गायकवाड यांच्यात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार असून, या दोन्ही दिग्गज मल्लांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. दुसरीकडे, गादी विभागातून नाशिकचा माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सद्गीर आणि सोलापूर शहरचा जय पाटील यांच्यात अंतिम झुंज रंगणार आहे. उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात जय पाटीलने माजी विजेता पृथ्वीराज मोहोळला अवघ्या 36 सेकंदात चितपट करून सर्वांना थक्क केले, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत हर्षवर्धन सद्गीरने 2020 मधील आपली लय कायम राखत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलवर 6-2 अशा गुणफरकाने मात करून अंतिम फेरीत धडक मारली. आता या चारही मल्लांपैकी 2026 चा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी कोण ठरणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. माती विभागाच्या पहिल्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत ‘भारंदाज’ डावाच्या जोरावर सोलापूर शहराच्या रविराज चव्हाणवर 10-0 असा एकतर्फी विजय मिळवला. तर दुसऱ्या अटीतटीच्या उपांत्य लढतीत हिंगोलीच्या ‘चपळ चित्त्या’ने म्हणजेच सिकंदर शेखने अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरचा 4-3 अशा निसटत्या गुणफरकाने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. या विजयामुळे आता माती विभागाच्या अंतिम झुंजीत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड या दोन दिग्गज मल्लांमध्ये कुस्तीचा थरार पाहायला मिळणार आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत माती विभागाच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा हिंगोलीचा ‘चपळ चिता’ सिकंदर शेख आणि सोलापूरचा ‘बाहुबली’ महेंद्र गायकवाड आमनेसामने ठाकले असून, या ‘रि-मॅच’मुळे कुस्ती शौकिनांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी 2023 च्या स्पर्धेतही हे दोन्ही तुफानी मल्ल माती विभागाच्या अंतिम लढतीत भिडले होते, मात्र त्यावेळी पंचांच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे सिकंदरला पराभव स्वीकारावा लागून महेंद्र गायकवाड विजयी ठरला होता, ज्यावर राज्यभरात मोठी टीका झाली होती. त्यानंतर महेंद्रला मुख्य अंतिम फेरीत शिवराज राक्षे कडून पराभूत व्हावे लागले होते. आता त्याच ऐतिहासिक वादाच्या पार्श्वभूमीवर, चपळाई विरुद्ध बलदंड शरीरयष्टी अशा या अटीतटीच्या झुंजीत कोण मैदान मारणार आणि 2023 च्या त्या वादाचा वचपा निघणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!