हिंगोलीचा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त संशोधक पुष्यमित्र जोशीला त्याच्या ॲक्वामित्र द्रावण या संशोधनाला केंद्र सरकारचे पेटंट मिळाले असून याबाबतचे पत्र त्याला नुकतेच देण्यात आले आहे. त्याच्या संशोधनासाठी हे तिसरे पेटंट प्राप्त झाले आहे. ॲक्वामित्र द्रावणातून पाण्यातील फ्लुराईडचे प्रमाण कमी करणारे द्रावण त्याने तयार केले आहे. भारताच्या २३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाण्यात फ्लुराईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे १० पेक्षा अधिक गंभीर आजार होतात. हाडे ठिसुळ होणे, किडणी विकारासह किडनीस्टोन व इतर गंभीर आजारांचा समावेश आहे. त्यामुळे देशभरात पाण्याच्या स्त्रोतांची वेळोवेळी तपासणी करून फ्लुराईडचे प्रमाण अधिक असलेले पाणीस्त्रोत बंद केले जातात. त्या स्त्रोताच्या परिसरात पाणी पिण्यास अयोग्य असा फलकही लावला जात आहे. दरम्यान, देशभरातील या समस्येवर उपाय म्हणून नवीन संशोधन करण्याचा निर्णय पुष्यमित्र याने घेतला होता. त्यानुसार त्याने विविध प्रयोग करून त्यातून ॲक्वामित्र हे द्रावण तयार केले. फ्लुराईडचे प्रमाण जास्त असलेल्या पाण्यात हे द्रावण मिसळल्यास फ्लुराईडचे प्रमाण कमी होऊन पाणीस्त्रोत पिण्यायोग्य होतात. कुठल्याही प्रकारच्या उर्जेशिवाय पाण्यातील फ्लुराईडचे प्रमाण कमी होत असल्याने अत्यंत कमी खर्चीक आहे. यामुळे दुर्गम भागातील लोकांना मोठा फायदा होणार आहे. सदरील ॲक्वामित्र द्रावण पेटंटसाठी केंद्र शासनाच्या पेटेंट कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर पेटंेंट कार्यालयाने त्यास मंजूरी देऊन त्याबाबतचे प्रमाणपत्र ता. १६ मार्च रोजी पुष्यमित्र यास पाठविले आहे. याआधी पुष्यमित्रच्या डिस्पोजमित्र व मोल्युस्क कॅचर या दोन उपकरणानांही पेटंट मिळाले आहे. पुष्यमित्राचे डिस्पोजमित्र उपकरण हे जैव वैद्यकीय कचऱ्याचे इको फ्रेंडली पद्धतीने विघटन करते तर मोल्युस्क कॅचर मासेमारी करणाऱ्यांसाठी उपयोगी ठरते. ब्रिक्स अंतरराष्ट्रीय संघटनेत दोनवेळा भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या पुष्यमित्र यास राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे. कोविड-१९ च्या काळात, त्याने डिस्पोजमित्र उपकरणाचा वापर करून मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावली आणि सॅनिटायझरची बाजारात कमतरता असताना त्याने स्वतःच सॅनिटायझर तयार करून गरजू लोकांना विनामूल्य वितरित केले होते. पुष्यमित्र जोशी याने विज्ञान, पर्यावरण आणि जीवनशास्त्र यावर तीन शैक्षणिक पुस्तके लिहिली आहेत, जी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्याचे २० हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर विविध जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्याचे ऐतिहासिक आणि राजकीय विषयांवर लेख देखील प्रसिद्ध आहेत. जी २० जागृती यात्रेत ‘बिझ ज्ञान ट्री’ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. पुष्यमित्र जोशीला पूर्णवाद युथ फॉर्मद्वारे प्रतिष्ठित युथ आयकॉन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्याच्या यशाबद्दल हिंगोलीकरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
