मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राजकीय वातावरण तापवणारी घडामोड घडली आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सकाळीच सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर करत सूचक इशारा दिला. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पक्ष सोडणाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका करताना दिसतात. जा, स्वतःचा जीव आणि करिअर वाचवा, मला काही फरक पडत नाही, असा संदेश त्या व्हिडिओतून देण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत राऊत यांनी ‘कहाणी अच्छी है!’ असे कॅप्शन दिले असून, त्यामागील राजकीय अर्थ काय याबाबत चर्चा रंगल्या आहेत. नववर्षाच्या शुभेच्छांचा माहोल असताना असा व्हिडिओ शेअर केल्यामुळे राऊतांनी कोणाला उद्देशून हा संदेश दिला, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. पक्षांतराच्या हालचालींवर हा इशारा असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, राऊत यांनी यामागील उद्देश स्पष्ट न केल्यामुळे राजकीय वर्तुळात कुतूहल अधिक वाढले आहे. काहीजणांच्या मते, हा संदेश पक्ष सोडण्याच्या विचारात असलेल्या नेत्यांना रोखण्यासाठी आहे. दरम्यान, राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा जोर धरू लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दौऱ्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठक झाल्यानंतर शिंदे यांनी आपल्या खासदारांचीही बैठक घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव गटातील चार खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हे घडल्यास दिल्लीतील शिंदे गटाची ताकद वाढणार असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळेच या पार्श्वभूमीवर राऊतांचे ट्वीट हे संभाव्य फुटीबाबतचा इशारा मानले जात आहे. ‘ऑपरेशन टायगर’ या चर्चेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकारणात मोठ्या उलथापालथीची चिन्हे एकूणच, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची चिन्हे दिसू लागली आहेत. राऊतांनी शेअर केलेला व्हिडिओ हा केवळ योगायोग आहे की त्यामागे ठोस रणनीती आहे, याचे उत्तर लवकरच स्पष्ट होणार आहे. उद्धव गटातील खासदार खरोखरच फुटणार का, की हा केवळ राजकीय दबावाचा भाग आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
