Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

सांगली जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेत संजयकाका पाटलांची छुपी मदत:जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भाजपमध्ये अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता

सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत भाजपसह महायुतीला धोबीपछाड दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी या सत्तासंघर्षात पडद्यामागून छुपी मदत केल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला असून, भाजपच्या गोटात सुरू असलेल्या सर्व हालचालींची इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचत होती, असेही त्यांनी म्हटले आहे. जयंत पाटलांच्या या दाव्यामुळे आता भाजपमध्ये अंतर्गत संशयाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री चंद्रकांत पाटलांवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत मी काही बोलणार नाही, ते माझे ‘हितचिंतक’ आहेत, असे म्हणत टोला लगावला. जिल्हा परिषदेत भाजपकडे बहुमत नव्हते, तरीही पोलिस यंत्रणेचा वापर करून सत्ता खेचून आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, विरोधकांनी केलेल्या कोणत्याही टीकेकडे लक्ष न देता आम्ही आमच्या उद्दिष्टाकडे वाटचाल केली आणि अखेर यश मिळवले, असेही जयंत पाटील म्हणाले. भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम करत सत्ता राखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार संगीता पाटील यांनी भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांचा पराभव करत अध्यक्षपदावर कब्जा केला. या चुरशीच्या निवडणुकीत संगीता पाटील यांना 34 मते मिळाली, तर स्वप्नाली मासाळ यांना केवळ 24 मतांवर समाधान मानावे लागले. आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी आखलेली संयुक्त रणनीती यशस्वी ठरल्याने भाजपच्या मिशन लोटसला सांगलीत मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीने वर्चस्व कायम राखले अध्यक्षपदापाठोपाठ उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम राखले. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांनी भाजप-युतीचे उमेदवार हिम्मत जाधव यांचा पराभव केला. या लढतीत लाड यांना 34 मते मिळाली, तर जाधव यांना 25 मते पडली. जिल्हा परिषदेच्या या निकालामुळे सांगलीच्या राजकारणात महाविकास आघाडीची पकड अधिक मजबूत झाली असून, सत्तास्थापनेच्या या संघर्षात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेना शिंदे गटामुळे भाजपला फटका आटपाडी तालुक्यातील शिवसेना शिंदे सेनेचे दोन सदस्य, जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील, मतदानावेळी गैरहजर राहिल्याने भाजप-युतीचे राजकीय गणित पूर्णपणे कोलमडले, ज्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला मिळाला. हे दोन्ही सदस्य युतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असतानाच, त्यांच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीचा विजय अधिक सुकर झाला. विशेष म्हणजे, मतदानाच्या एक दिवस आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगलीत गुप्त बैठक घेऊन उमेदवार आणि मतदानाची जी सूक्ष्म रणनीती आखली होती, ती या निकालात पूर्णपणे यशस्वी ठरल्याचे दिसून आले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!