राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटातून उमेदवारी दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात शरद पवार गट आपला उमेदवार उभा करणार नसल्याची भूमिका मांडली होती. सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असतानाच आता महाविकास आघाडीत यावरून मतभेद समोर आले आहेत. सुप्रिया सुळेंच्या या भूमिकेशी असहमती दर्शवत काँग्रेसने बारामतीत मोठा ट्विस्ट आणला आहे. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही. जर शरद पवारांची राष्ट्रवादी या जागेवर निवडणूक लढवणार नसेल, तर काँग्रेस स्वतः उमेदवार देण्याबाबत गांभीर्याने विचार करेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांत येत्या 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून, 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. जर तिकडे राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही तिकडे निवडणूक लढायचा विचार करू. पवार विरुद्ध पवार निवडणुका यापूर्वी झाल्या आहेत. ही जागा राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. विलिनीकरण हा विषय होता तेव्हा काँग्रेसशी चर्चा केली नव्हती. आता निवडणुका होत आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या सुनेत्रा वहिनीविरोधात कसा उमेदवार देणार. त्यांची भूमिका महाविकास आघाडी म्हणून मान्य नाही. जर राष्ट्रवादी लढणार नसेल तर काँग्रेसला तिथे उमेदवार देण्याबाबत विचार करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. बारामती निवडणुकीत आता मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला येथील निवडणूक बिनविरोध होणार असे बोलले जात होते. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कुठलाही उमेदवार देणार नसल्याची भूमिका शरद पवार गटाने घेतली आहे. मात्र आता कॉंग्रेसने उमेदवार देण्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी देखील आपण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे येथील निवडणूक ही तिहेरी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काय म्हणाले होते लक्ष्मण हाके? लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावे, इथे पवार सोडून विधानसभेला उमेदवार द्यावा. आम्ही निवडणूक लढवतो पण काही जणांच्या पोटात दुखते. सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर पाठवा, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, असे हाके यांनी म्हटले होते. महाराष्ट्रात निधनानंतर बिनविरोध निवडणुकांची परंपरा नाही- हर्षवर्धन सपकाळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. “महाराष्ट्रात दुःखद निधनानंतर निवडणूक बिनविरोध करण्याची कोणतीही परंपरा नाही. अपवादात्मक परिस्थिती वगळता राजकीय भूमिका घेऊनच निवडणुका लढवल्या जातात,” असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. सपकाळ यांच्या या भूमिकेमुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार की गाजणार, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. वाचा सविस्तर