शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी प्रथमच सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या ‘ऑपरेशन तुडवा’ वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर देत थेट आव्हान दिले. तसेच आपण पैशांसाठी नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि मतदारसंघाच्या विकासासाठी निर्णय घेतल्याचा दावा केला. “तू काय तुडवणार आम्हाला? तुडवायलाही दम लागतो” ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या खासदारांविरोधात संजय राऊत यांनी “ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुडवा करू” असा इशारा दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना संजय जाधव यांनी राऊतांवर निशाणा साधला. “तू काय आम्हाला तुडवणार? अरे, तुडवायलाही दम लागत असतो. असं बोलून काही होत नाही. संजय राऊत यांनी कधी कुणाला चापट मारली का? त्यांनी अशा प्रकारची भाषा करू नये,” असे जाधव म्हणाले. ते पुढे म्हणाले, “राऊत साहेब देशपातळीवरील नेते आहेत. त्यांची वैचारिक उंची मोठी आहे. त्यांनी वैचारिक भाषेत बोलावे. तुडवण्याची भाषा त्यांच्या तोंडून शोभत नाही. ती भाषा आम्ही करायची असते.” “राऊत मोठे वक्ते, पण लोकांमधून निवडून आले नाहीत” संजय राऊतांवर आणखी टीका करताना जाधव म्हणाले, “राऊत साहेब मोठे वक्ते आहेत, देशभरात त्यांचे चाहते आहेत आणि टीकाकारही आहेत. ते उत्तम लेखक आहेत. मात्र त्यांनी कधी लोकांमधून निवडणूक लढवून विजय मिळवलेला नाही. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना त्यांना कितपत समजतात, हा प्रश्न आहे.” त्याचवेळी त्यांनी संजय राऊतांविषयी आदरही व्यक्त केला. “संजय राऊत हे वरिष्ठ आणि सन्माननीय व्यक्तिमत्त्व आहे. देशभरातील लोक त्यांना ओळखतात. त्यांची वैचारिक पातळी वेगळी आहे,” असे ते म्हणाले. “माझे कार्यकर्ते विकत घेता येणारे नाहीत” पक्षांतराच्या निर्णयावर बोलताना जाधव यांनी कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याचा उल्लेख केला. “माझं माझ्या कार्यकर्त्यांवर प्रेम आहे आणि त्यांचं माझ्यावर. हे पैसे देऊन विकत घेता येणारे लोक नाहीत. ते मनापासून माझ्यासोबत आहेत. मी घेतलेल्या निर्णयामागे माझे कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत. समाजहित आणि विकासकामांसाठी जनतेने मला निवडून दिलं आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. “पैसे घ्यायचे असते तर 2022 लाच गेलो असतो” पक्षांतरासाठी आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपांनाही त्यांनी फेटाळून लावले. “जर आम्हाला पैसेच घ्यायचे असते, तर आम्ही 2022 मध्येच गेलो असतो. एवढा वेळ थांबलो नसतो. आम्ही ज्या लोकांसोबत राहिलो, तेच आमच्या सोबत राहिले नाहीत. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला,” असे जाधव म्हणाले. ते पुढे म्हणाले, “परभणीने नेहमी धनुष्यबाणाला साथ दिली आहे. विरोधी पक्षात राहून विकासकामे होत नव्हती. निधी मिळत नव्हता. कार्यकर्त्यांची कामे रखडत होती. त्यामुळे सत्तेत जाऊन विकास करणे आवश्यक होते.” राहुल पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा भाषणादरम्यान संजय जाधव यांनी नाव न घेता आमदार राहुल पाटील यांच्यावरही टीका केली. “लोकांमध्ये राहा, काम करा, मग लोक तुम्हालाही आमदार करतील. काही जण सगळंच स्वतःकडे ठेवत होते, इतरांना काही मिळत नव्हतं,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, “आता एक खासदार आणि एक आमदार एकाच पक्षात आले आहेत. विरोधकांनीही आता एकदा दूध का दूध, पाणी का पाणी करून घ्यावं,” असेही ते म्हणाले. “दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात” राजकीय आरोप-प्रत्यारोपांदरम्यान संजय जाधव यांनी एक महत्त्वाची भावना व्यक्त केली. “दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र याव्यात, अशी माझी इच्छा आहे,” असे ते म्हणाले. धनुष्यबाणाच्या वादावर बोलताना त्यांनी सांगितले की, “2029 ची निवडणूक आम्ही लढू आणि जिंकू. पण शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत आलो आहोत.” “आरोपांकडे लक्ष देऊ नका” कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पक्षांतरावर होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. “कोण काय आरोप करतो, याकडे लक्ष देऊ नका. आपण विकासासाठी आलो आहोत. पुढची तीन वर्षे मतदारसंघाच्या विकासासाठी वापरायची आहेत. विरोधी बाकांवर बसून काही साध्य होत नव्हतं. आता सत्तेच्या माध्यमातून विकासकामे पूर्ण करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, संजय राऊत आणि संजय जाधव यांच्यातील शाब्दिक चकमकही आता चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चा आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर संजय जाधव यांची ही प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. कार्यकर्त्यांशी असलेले नाते आणि आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचा संदेश त्यांनी दिल्याने ठाकरे गटासाठी हा दिलासादायक संकेत मानला जात आहे. “हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी”; श्रीकांत शिंदेंचं सूचक विधान शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे यांनी “हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे,” असे म्हणत आगामी काळात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत दिले. “गेली चार वर्षे आम्ही राजकीय धक्केच देत आहोत” प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “स्फोटावर स्फोट होतच राहतील. गेली चार वर्षे आम्ही फक्त राजकीय धक्केच देत आलो आहोत. ‘ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’.” त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुती आणि विरोधी पक्षांच्या राजकारणात आणखी कोणते बदल होणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. संबंधित बातमी वाचा…, 2022 ला चौकार मारला, आता थेट ‘सिक्सर’:हे ऑपरेशन टायगर फुलप्रूफ अन् सक्सेसफुल! एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
“आम्ही कोणतेही ‘ऑपरेशन’ अर्धवट सोडत नाही, तर ते ‘फुलप्रूफ’ करतो. 2022 मध्ये आम्ही जेव्हा उठाव केला, तेव्हा चाळीस आमदारांचा चौकार मारला होता आणि आता थेट 6 खासदारांचा षटकार (सिक्सर) मारला आहे,” अशी तुफान फटकेबाजी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का दिला. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांनी अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवसेनेत’ प्रवेश केला. या प्रवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले. येथे वाचा सविस्तर…
