जेफ्री एपस्टीन तुरुंगात मृत सापडला:भोंदू अशोक खरात जिवंत राहील याची व्यवस्था करा, आमदार जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज भोंदू अशोक खरातला कोणत्याही स्थितीत जिवंत ठेवण्याची मागणी केली. अशोक खरातला महाराष्ट्रातील मागील 20 वर्षांच्या राजकारणाची इत्यंभूत माहिती आहे. त्यामुळे त्याची गत जेफ्री एपस्टीनसारखी होऊ नये यासाठी त्याला कायम कॅमेऱ्याखाली ठेवा. तो जिवंत राहील याची व्यवस्था करा, असे ते म्हणालेत. जितेंद्र आव्हाड विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना म्हणाले, अशोक खरातने बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा 2007 मध्ये खून केला. नाशिकमध्ये याची शांतपणे चर्चा सुरू होती. तेव्हा कुणीही हे प्रकरण गांभिर्याने घेतले नाही. या प्रकरणी एका वृत्तपत्रात 10 लेख लिहून आले. त्यामुळे अशोक खरात पत्रकारांना माहिती नव्हता, पोलिसांना माहिती नव्हता, महाराष्ट्राला माहिती नव्हता असा भाग नाही. मग हा गुप्तहेर यंत्रणेचे अपयश नाही का? अशोक खरातची माहिती मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना देणे गरजेचे होते की नाही. या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले हे कुणाला माहिती असेल तर ते केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच ठावूक आहे. चांगले अधिकारी तिथे जाऊन लोटांगण घालत आहेत जितेंद्र आव्हाड म्हणाले, या प्रकरणात चांगल्या – चांगल्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले. चांगले-चांगले अधिकारी तिथे जाऊन लोटांगण घालत आहेत. मी खात्रीने सांगतो की, अशोक खरातच्या माध्यमातून काहीजण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत होते. हे मुख्यमंत्र्यांनाही माहिती आहे. हे लोक अशोक खरातकडे पुजा घालण्यासाठी गेले होते. वेळ येईल तेव्हा नाव उघड करू. ही सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना 6 महिन्यांपूर्वी मिळाली होती. थोडे दिवस द्या मुख्यमंत्री घरी गेलेले असतील अशी हमी अशोक खरातने या लोकांना दिली होती. अशा प्रकारच्या पुजेला, जादूला राजमान्यता देणार असू, सरकारी पैसा देणार असू तर हे खूप वाईट आहे. करंगळ्या कापणाऱ्या 38 आमदारांची लिस्ट जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी करंगळ्या कापणाऱ्या 38 आमदारांची लिस्ट उपलब्ध असल्याचाही दावा केला. ते म्हणाले, अशोक खरातच्या ठिकाणांवर सरकारी पैशांच्या माध्यमातून पाण्याच्या टाक्या व रस्ते बांधण्यात आले. एवढा कोण मोठा आहे तो खरात? कुठला काळ्या जादूवाला आहे. वाईट या गोष्टीचे वाटते की, या संत तुकारामांच्या, संत ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण काळ्या जादूला एवढी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूने काहीही होऊ शकते असे समस्त आमदारांना वाटायला लागले आहे. तिकडे जाऊन करंगळ्या कापणाऱ्या 38 आमदारांची लिस्ट आहे. अशी कशी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली? हा खरात वेगवेगळ्या खात्यातील बदल्याही करत होता, असे आव्हाड आपला संताप व्यक्त करताना म्हणाले. अशोक खरातला कायम कॅमेऱ्याखाली ठेवा जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी अशोक खरातला कायम सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवण्याचीही मागणी केली. ते म्हणाले, इराणचे युद्ध हे केवळ जेफ्री एपस्टीनच्या फाईल्स बाहेर येऊ नये म्हणून सुरू आहे. जेफ्री एपस्टीनला माहिती असणाऱ्या सगळ्या गोष्टी पटलावर आल्या तर सर्वकाही संपेल. त्यामुळे त्याचे काही बाहेर येऊनच नये म्हणून त्याला ठेवलेल्या सेलमध्ये 1 मिनिट 30 सेकंदांचा अंधार होतो आणि जेफ्री एपस्टीन मेलेला सापडतो. अशोक खरातचे असे काही होऊ नये. मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करणार आहे की, त्याला कायमच्या कॅमेऱ्यांमध्ये ठेवा. तो जिवंत राहील याची व्यवस्था करा. कारण, अशोक खरातला मागच्या 20 वर्षांतील महाराष्ट्रातील राजकारणाची इत्यंभूत माहिती आहे. आदिवासी उगीच बदनाम, इथे चांगल्या घरांमध्ये जादूटोणा सुरू ते पुढे म्हणाले, कुणी काय केले, पुजा कुणी केली, पुजा कशी घातली गेली, कुणी रक्त दिले हे सगळे अशोक खरातला माहिती आहे. महाराष्ट्राला खरेच नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे न्यायचा असेल, हा जादू टोणा महाराष्ट्रात थांबवायचा असेल, आपण उगीचच त्या आदिवासींना जादूटोणा करतात म्हणून दोष देतो, इथे चांगल्या चांगल्या घरांमध्ये जादूटोणा सुरू आहे. कारण, लोकांचा विश्वास काळ्या जादूवर बसायला लागला आहे. मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांचे काही सहकारीच त्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते तिथे जाऊन पुजेसाठी जाऊन रांग लावून बसले होते. ज्या अर्थी मुख्यमंत्री या प्रकरणाच्या चौकशीत एवढे घुसलेत, त्या अर्थी त्यांना संशय आहे. त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे. पण जे काही घडत आहेत ते महाराष्ट्रासाठी चांगले नाही, असे आव्हाड म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!