महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 7 खासदार आणि 16 आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना आमदार आणि विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांनी केल्यानंतर आता शिंदे गटातील इतर वरिष्ठ नेत्यांनीही या चर्चांना दुजोरा देणारी वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, एका बाजूला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा फेटाळून लावत असताना, दुसऱ्या बाजूला शिंदे गटातील मंत्री आणि नेते “थोडी वाट पाहा, निकाल दिसेल” असे सूचक वक्तव्य करत आहेत. “7 खासदार, 16 आमदार संपर्कात”; कृपाल तुमाने यांचा मोठा दावा कृपाल तुमाने यांनी वृत्तसंस्थांशी बोलताना दावा केला की, ठाकरे गटातील 7 खासदार शिंदे सेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. “हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करू इच्छितात. तसेच ठाकरे गटाचे 16 आमदारही आमच्या संपर्कात आहेत. गेल्या महिनाभरापासून चर्चा सुरू असून आता ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे,” असे तुमाने म्हणाले. तसेच हा सर्व राजकीय घटनाक्रम संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी घडू शकतो, असे संकेतही त्यांनी दिले. प्रताप सरनाईक यांची सूचक प्रतिक्रिया दरम्यान, राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “आमच्या पक्षाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. कुणी खासदार आमच्या पक्षात येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करू,” असे सरनाईक म्हणाले. सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. दुसरीकडे, मंत्री जयकुमार गोरे यांनीही या चर्चांवर भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्या नव्या गटाला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या वक्तव्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दीपक केसरकर यांचे सूचक विधान; “निकालासाठी वाट पाहा” शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि आमदार दीपक केसरकर यांनीही ‘ऑपरेशन टायगर’वर प्रतिक्रिया देताना अनेक संकेत दिले. ते म्हणाले, “याला ऑपरेशन टायगर का म्हटले जाते? कारण वाघ हे शिवसेनेचे चिन्ह आहे आणि शिवसेना दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. अनेक लोक शिवसेनेत येऊ इच्छित आहेत. अनेक लोकप्रतिनिधी आधीच पक्षात दाखल झाले आहेत किंवा प्रवेशाच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होणार आहे.” संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केसरकर म्हणाले, “त्यांच्या पक्षात फूट पडू नये यासाठी हा शेवटच्या क्षणाचा प्रयत्न आहे. पण निकालासाठी थोडी वाट पाहावी लागेल.” “शिंदे आणि महायुतीबद्दल आकर्षण वाढले” केसरकर यांनी पुढे दावा केला की, राज्यात एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारबद्दल लोकांमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. “महाराष्ट्रात शिंदे आणि महायुती सरकारबद्दल इतके आकर्षण आहे की अनेक जण आमच्यासोबत येऊ इच्छित आहेत. काही घडलेच तर ते महाराष्ट्राच्या हिताचेच असेल,” असेही ते म्हणाले. संजय राऊतांचा पलटवार; “आम्हीच वाघ आहोत” दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सर्व दाव्यांना फेटाळून लावत पक्ष एकसंध असल्याचा दावा केला आहे. “कसलं ऑपरेशन टायगर? आम्ही स्वतःच वाघ आहोत. आम्ही ‘ऑपरेशन वुल्फ’ सुरू करू. आम्ही कोणालाही घाबरत नाही. आमचे सर्व खासदार आणि संसदीय पक्ष एकजूट आहे,” असे राऊत यांनी म्हटले होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सर्व खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीला पक्षाचे सर्व नऊ खासदार उपस्थित राहिल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मोठा राजकीय भूकंप? लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. कृपाल तुमाने यांचा 7 खासदार आणि 16 आमदारांचा दावा, प्रताप सरनाईक यांचे स्वागताचे वक्तव्य आणि दीपक केसरकर यांचे “निकालासाठी थांबा” हे विधान यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आणखी तीव्र झाली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही खासदाराने किंवा आमदाराने उघडपणे ठाकरे गट सोडण्याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे हा केवळ राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की प्रत्यक्षात मोठी फूट पडणार आहे, याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळणार आहे.सध्या तरी पावसाळी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल लागल्याची चर्चा रंगू लागली आहे.
पावसाळी अधिवेशनाआधी मोठा राजकीय स्फोट?:तुमानेंचा 7 खासदार, 16 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा; केसरकर म्हणाले- शिवसेना आणखी मजबूत होणार!
auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 7 खासदार आणि 16 आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना आमदार आणि विधान...