हाय-प्रोफाईल लोकांसाठी निष्ठेचा बळी?:प्रियांका चतुर्वेदींची तुलना राऊतांशी होऊच शकत नाही! उरल्या-सुरल्या शिवसैनिकांनी आत्मचिंतन करावे- नरेश म्हस्के

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्या संजय राऊतांनी पक्षासाठी अहोरात्र कष्ट केले, सर्वांच्या अंगावर गेले, त्यांच्याबद्दल जर पक्षात अशी भूमिका घेतली जात असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची नाराजी आणि २०२८ मध्ये संजय राऊत खासदार नसतील, अशा आशयाचे विधान आदित्य ठाकरे यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हस्के बोलत होते. ..तर हे त्या पक्षाचे दुर्दैव खासदार म्हस्के म्हणाले की, संजय राऊत यांनी कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत असतानाही पक्षासाठी काम करणे सोडले नाही. पक्षासाठी ते सर्वांशी भिडले. पण आज जर त्यांनाच बाजूला सारण्याची भाषा केली जात असेल, तर हे त्या पक्षाचे दुर्दैव आहे. चतुर्वेदींची तुलना राऊतांशी होऊ शकत नाही नरेश म्हस्के म्हणाले की, प्रियांका चतुर्वेदी असो किंवा इतर कोणी, त्यांची तुलना संजय राऊतांच्या संघर्षाशी होऊ शकत नाही. केवळ ‘हाय-प्रोफाईल’ लोकांसाठी जुन्या जाणत्या नेत्यांचा सन्मान राखला जात नसेल, तर उरल्या-सुरल्या शिवसैनिकांनी आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पक्षासाठी झटणाऱ्या नेत्यांची किंमत नाही? नरेश म्हस्के म्हणाले की, आदित्य ठाकरे खरंच असं बोलले आहेत का? याचे उत्तर खुद्द संजय राऊतांनीच दिले पाहिजे. ज्या अन्यायाविरोधात एकनाथ शिंदेंनी बंड केले, तशीच वेळ आता राऊतांवर आली आहे का? असा खोचक सवालही म्हस्केंनी उपस्थित केला.आम्ही जेव्हा हे सर्व सांगत होतो, तेव्हा आमच्यावर टीका झाली. पण आज तेच चित्र पुन्हा दिसत आहे. पक्षासाठी झटणाऱ्या नेत्यांची किंमत उरली नसेल, तर ते चिंताजनक आहे. राऊत, आदित्य ठाकरेंत मतभेद – म्हस्के हक्काची जागा पवारांच्या झोळीत टाकल्याने पक्षात संतापाची लाट आहे. एकेकाळी ज्यांना जायचे आहे त्यांनी जा असे ठणकावून सांगणारे ठाकरे आता माझा तुमच्यावर विश्वास आहे अशी आर्जवाची भाषा वापरत आहेत. प्रियांका चतुर्वेदींच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. त्यांच्यात मोठी खडाजंगी आणि शाब्दिक चकमक झाल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. शरद पवारांसाठी जागा सोडल्याने चतुर्वेदी ठाकरेंसमोरच संतापल्या ऑपरेशन टायगर’च्या दहशतीखाली असलेल्या ठाकरे गटात आता अंतर्गत बंडाळीचा वणवा पेटला आहे. मातोश्रीवर पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीत राज्यसभेच्या जागेवरून अभूतपूर्व हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ही जागा शरद पवारांसाठी सोडल्याने प्रियांका चतुर्वेदी यांनी थेट शड्डू ठोकला. आदित्य ठाकरेंच्या कार्यशैलीवर खासदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. बैठकीत प्रियांका चतुर्वेदी यांनी संजय राऊतांच्या भूमिकेवर थेट प्रहार केला. संजय राऊत यांनी पवारांचे नाव का घेतले? मला माझा तीव्र निषेध नोंदवायचा आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावर उद्धव ठाकरे यांनी “पक्षप्रमुख मी आहे. निर्णय माझाच असेल,’ असे सुनावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, वादाची ठिणगी अधिकच भडकली. मराठवाड्यातील एका खासदाराने, चतुर्वेदींना 6 वर्षे संधी देऊन पक्षाला काय फायदा झाला? असा बोचरा सवाल केला.

Leave a Comment

error: Content is protected !!