नाशिक येथील एका विशेष न्यायालयाने रविवारी भोंदू अशोक खरातची 1 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. यामुळे पोलिसांना या बहुचर्चित प्रकरणाच्या आणखी मुळाशी जाण्याची संधी मिळाली आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांसह अनेक राजकीय नेते व बडे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.ट आज कोर्टात काय झाले? आज झालेल्या सुनावणीत सरकार वकील व बचाव पक्षांत जोरदार युक्तिवाद झाला. सरकारी पक्षाची बाजू वकील शैलेंद्र बागडे यांनी मांडली, तर आरोपीतर्फे सचिन भाटे यांनी युक्तिवाद केला. सरकारी वकील म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात आरोपीला समक्ष घेऊन चौकशी करण्याची गरज आहे. या प्रकरणी काही विशिष्ट कोडवर्ड वापरले गेल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याचा उलगडा करण्यासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीची गरज आहे. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याची बाबही वकिलांनी यावेळी न्यायमूर्ती एम व्ही भराडे यांच्या निदर्शनास आणून दिली. अशोक खरात या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. त्याच्या मोबाईलमधील डेटा तपासणे, जंगम मालमत्तेचा शोध घेणे व त्याच्याशी संबंधित इतर बाबींची चौकशी करण्यासाठीही पोलिसांना त्याची कोठडी हवी आहे. आरोपीने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तपासाला अधिक वेळ देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. त्यावर बचाव पक्षाने जोरदार आक्षेप घेतला. तपास यंत्रणांकडे आधीपासूनच या प्रकरणी योग्य ते पुरावे आहेत. त्यामुळे आरोपीला पुन्हा पोलिस कोठडीत पाठवण्याची काहीच गरज नाही. मोबाईलीच क्लोन कॉपी पोलिसांकडे यापूर्वीच उपलब्ध आहे, असे ते म्हणाले. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने भोंदू खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शनिवारी झाली सलग 10 तास चौकशी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने शनिवारी खरातची सलग 10 तास कसून चौकशी केली. त्यानंतर त्याच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातील कार्यालयाचीही झाडाझडती घेण्यात आली. या कार्यालयातील अत्युच्च दर्जाच्या काळ्या काचा पाहून पोलिसही थक्क झाले. अशोक खरातने आपल्या कार्यालयाची रचना करताना खास काळजी घेतली होती. आपल्या केबिनच्या बाहेर लोकांची गर्दी असतानाही आतमध्ये तो महिलांचे बिनधास्तपणे लैंगिक शोषण करायचा. केबिनच्या दरवाज्याबाहेर महिलांचे पती किंवा इतर लोक बसलेले असायचे. पण या काचांमुळे त्यांना आत केबिनमध्ये काय सुरू आहे याचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे खरातच्या काळ्या कारवायांत कोणताही अडथळा येत नव्हता. त्यामुळे एसआयटी या प्रकरणी खरातच्या कार्यालयाचा कानाकोपरे धुंडाळून त्याच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. देशभक्तीचा देखावा, स्वच्छ प्रतिमेचा आव देशभक्तीच्या गप्पा, भिंतीवरील तिरंगा आणि हरिवंशराय बच्चन यांची ‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ ही प्रेरणादायी कविता… हे चित्र एखाद्या स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीच्या कार्यालयाचे असावे असेच कुणालाही वाटेल. पण कॅनडा कॉर्नरमधील हे 210 चौरस फुटांचे कार्यालय म्हणजे भोंदू अशोक खरातचा महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा अड्डा बनले होते. रॅगिंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी बेड्या ठोकलेल्या कॅप्टन खरातने याच झेड ब्लॅक काचांच्या आड महिलांचे शोषण करत आपल्या विकृत वासनेचा बाजार मांडला होता. त्याच्या या कार्यालयाची शनिवारी 28 मार्च रोजी फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी कसून तपासणी केली. राजकारण्यांचा पैसा व्याजाने दिल्याचा संशय भोंदू खरात भोवतालचा चौकशी यंत्रणांचा फास आता आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक खरात आपल्या संपर्कातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक व राजकारण्यांचा काळा पैसा जमा करुन व्याजाने द्यायचा. याशिवाय, तो हवालामार्फत देश – विदेशात शेकडो कोटींची हेराफेरी करत आल्याचीही माहिती आहे. त्याच्या या आर्थिक गैरव्यवहाराच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या सगळ्याची चौकशी ई़डीकडून होण्याची शक्यता आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांचा अहवाल ईडीकडे जाणार आहे. त्यानंतर ईडी या तपासाची सूत्रे हाती घेऊ शकते. तसे घडल्यास अशोक खरात याच्या अडचणी आणखी वाढू शकतात. खरातचा बंगला नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या कर्मयोगीनगर येथे अशोक खरातचा आलिशान बंगला आहे. या बंगल्यासमोरून जाताना आजही अंगावर काटा येतो. ज्या परिसरात तीन – तीन माजी आमदार वास्तव्यास आहेत, त्याच गल्लीत 2012 च्या सुमारास भोंदू खरातने 5 कोटींहून अधिकचा खर्च करून आपला महाल उभा केला. तृप्तबाला नाव असलेला हा बंगला केवळ त्याच्या भव्यतेसाठी नाही, तर तिथे चालणाऱ्या काळपट कृत्यांमुळे कायमच संशयाच्या भोवऱ्यात राहिला. आता लैंगिक अत्याचाराचे गंभीर पाश समोर आल्यानंतर, या बंगल्याच्या भिंतींमागे दडलेली अनेक काळी रहस्ये उघड होऊ लागली आहेत. अमावस्येच्या रात्री बंगल्यावर नेते, अधिकाऱ्यांचा रांगा एरव्ही खरातच्या कुटुंबातील सदस्यांचा वावर असलेल्या या बंगल्याचे रूप अमावास्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचे. ‘अमावास्येच्या रात्री या बंगल्याबाहेर महागड्या चारचाकी वाहनांच्या रांगा लागायच्या, असे एका स्थानिक नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. राजकीय नेते, बडे अधिकारी आणि आपली ओळख लपवू पाहणारे व्हीआयपी लोक खरातच्या अधिकृत कार्यालयात न जाता, चोरट्या पावलांनी थेट या बंगल्याची पायरी चढायचे. रात्रीच्या काळोखात रंगणाऱ्या या दरबारात नक्की काय चालायचे याची चर्चा आता संपूर्ण नाशिकमध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे. कॅप्टन खरातच्या लैंगिक अत्याचाराचे पाप चव्हाट्यावर आल्यानंतर कर्मयोगीनगरमधील चित्र बदलले आहे. ज्या बंगल्याकडे लोक कधीकाळी कुतूहलाने पाहायचे, तिथे आता भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
