जमिनीच्या जुन्या वादातून कामती खुर्द (लमाणतांडा) येथील ७२ वर्षीय संजीवकुमार नागनाथ शिंदे यांचा तलवारीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, संजीवकुमार शिंदे यांचे वडील नागनाथ शिंदे यांनी १९९८ मध्ये त्यांच्या मालमत्तेचे तीन मुलांमध्ये वाटप केले होते. त्यानुसार संजीवकुमार यांना १२ एकर शेतजमीन मिळाली होती. या वाटपावरून कुटुंबात वाद सुरू होते. यापूर्वीही न्यायालयात प्रकरण गेले होते व २०२३ मध्ये निकाल शिंदे कुटुंबाच्या बाजूने लागला होता. त्यानंतर संजीवकुमार शिंदे यांनी त्यांच्या मालकीच्या १२ एकर जमिनीपैकी ६ एकर जमीन विजय धाडगे, विनय धाडगे व ज्योती धाडगे यांना विक्री केली होती. या व्यवहाराला नातेवाइकांनी हरकत घेतली होती. याच रागातून हा हल्ला झाल्याचा आरोप मृताच्या पत्नी सुनीता शिंदे यांनी फिर्यादीत केला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी संजीवकुमार शिंदे हे दूध व पाणी आणण्यासाठी घरातून गेले होते. काही वेळाने त्यांना पतीचा आवाज ऐकू आला. त्या घटनास्थळी गेल्या असता रणजित सतीश शिंदे व रितेश सतीश शिंदे यांच्या हातात तलवारी होत्या. तर सुरेखा सतीश शिंदे यांनी संजीवकुमार यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकल्याचे त्यांनी पाहिले. दोघांनी तलवारीने संजीवकुमार यांच्या डोक्यावर, गळ्यावर व हातावर वार केल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवला.
