उद्धव ठाकरेंनी विरोधक मजबूत होण्यासाठी गावोगाव फिरावे:मंत्री चंद्रकांत पाटलांचा उपरोधिक सल्ला; भोंदू खरातच्या मुद्यावरही भाष्य

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्ष मजबूत होण्यासाठी गावोगाव फिरण्याचा उपरोधिक सल्ला दिला आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत नसेल तर सत्ताधारी पक्ष अंकूश नसल्यासारखा वागू शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी विरोधक मजबूत होण्यासाठी गावोगाव फिरावे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेवर आपले नाव असल्याची बाब आपल्याला आत्ताच समजली असेही स्पष्ट केले. मंत्री चंद्रकात पाटील मंगळवारी कारागीर महाकुंभाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. तिथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती, मोहित कंबोज – आदित्य ठाकरे भेट, भोंदू अशोक खरात प्रकरण, गोकूळ निवडणूक आदी विविध विषयांवर भाष्य केले. तसेच उद्धव ठाकरेंकडून आगामी निवडणुकांसाठी सुरू असलेल्या तयारीवरही भाष्य केले. ते म्हणाले, मी उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन करेल. जिल्हा परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांची महाराष्ट्रात एकही सभा झाली नाही. त्यामुळे त्यांना असे वाटले असेल की, प्रयत्ने रगडीता वाळूचे कण, त्यातून निघे तेल. प्रयत्न केले तर यश मिळेल असा त्यांना साक्षात्कार झाला असेल. त्यामुळे मी त्यांचे मनापासून अभिनंदन करेल. कारण, या राज्यात जसे सरकार मजबूत आहे, तसा विरोधी पक्षही मजबूत पाहिजे. लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत नसेल, तर सत्ताधारी पक्ष अंकूश नसल्यासारखा वागू शकतो. आमचे असे नाही. पण विरोधक मजबूत होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी गावोगाव फिरावे. शरद पवारांचे एक वैशिष्ट आहे. तब्येत खराब झाल्यामुळे ते गेले काही दिवस घरी होते. पण आता प्रकृती सुधारल्यानंतर ते लगेचच दौऱ्यावर घराबाहेर पडलेत, असे ते म्हणाले. भोंदू खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेवर नाव भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेवर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची नावे आहेत. पत्रकारांनी याकडे मंत्री पाटलांचे लक्ष वेधले असता ते पत्रकारांना उद्देशून म्हणाले, ही आपली ग्रामीण पद्धतच आहे. तुमच्या घरच्या लग्नाला तु माझे नाव टाका. तुम्ही टाकणारच ते. त्यामुळे ते येणार की नाही येणार? विचारले की नाही विचारले? यापेक्षा एक प्रतिष्ठा असते की एवढ्या सगळ्यांना विचारले. मला आत्ताच कळले की, माझे पत्रिकेवर नाव पत्रिकेवर आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सव्वा महिन्याच्या अधिवेशनात किमान दोनदा याचे डिटेल निवेदन केले आहे, असे ते म्हणाले. मोहित कंबोज – आदित्य ठाकरे भेटीवरही भाष्य भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे ठाकरे गट भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नांत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पत्रकारांनी याविषयी चंद्रकांत पाटील यांना छेडले असता त्यांनी आपल्याला याविषयी काहीच ठावूक नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, मला याविषयी काहीही माहिती नाही. माझा प्रॉब्लेम काय झाला आहे की, मी माझ्या विषयाच्या बाहेरच पाहत नाही. हा माझा प्रॉब्लेम व बलस्थानही आहे. आपल्याला दिले ते करा. मोहित कंबोज राहतात कुठे, मुलाची पार्टी की मुलीची पार्टी. आले कोण, का आले, काय करायचे आपल्याला? असे ते उपरोधिकपणे म्हणाले. देशाचे राजकारण भाजपला डावलून होणार नाही दरम्यान, गोकूळच्या निवडणुकीत इतर पक्षांना भाजपला डावलता येणार नाही, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. भाजपला वेगळे ठेवून आता या देशातील राजकारण चालूच शकत नाही. गोकूळचे कसे चालेल. ही सुरुवात आहे. आता भेटीगाठी होतील. गोकूळची निवडणूक महायुती म्हणून लढणार आणि बिनविरोध व्हायची असेल तर सर्व नेते बसून निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!