राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेतून विरोधी पक्षातील खासदारांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात असतानाच, या रणनीतीला भाजप हायकमांडकडून ब्रेक लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः शरद पवार गटातील खासदारांना थेट शिंदे गटात न घेता, त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षातून एनडीएमध्ये प्रवेश करावा, असा सल्ला देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन तुतारी’च्या माध्यमातून शरद पवार गटातील 6 आणि ठाकरे गटातील 6 खासदारांना आपल्या पक्षात आणण्याची तयारी केली होती. सध्या शिंदे गटाकडे 7 खासदार आहेत. जर हे 12 खासदार त्यांच्या गटात सामील झाले असते, तर एकूण संख्या 19 वर पोहोचली असती. या वाढलेल्या संख्याबळामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असती. या संभाव्य वाढत्या संख्याबळाच्या जोरावर 2029 च्या लोकसभा निवडणुकीत किमान 19 जागांवर दावा करण्याची शिंदे गटाची रणनीती असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपकडून या योजनेला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. याच पार्श्वभूमीवर, दिल्लीतील अलीकडील भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना भेट दिली नसल्याची माहितीही समोर आली आहे, ज्यामुळे या राजकीय घडामोडींना आणखी वेगळे वळण मिळाले आहे. दरम्यान, ठाकरे आणि पवार गटातील काही खासदार शिंदे गटाकडे वळण्याच्या शक्यतेमागे काही कारणेही चर्चेत आहेत. महायुतीचे राज्य आणि केंद्रात मजबूत सरकार असल्याने भविष्यातील राजकीय स्थैर्याची हमी मिळते, असे अनेक खासदारांना वाटत असल्याचे बोलले जाते. तसेच विकासकामांसाठी निधी मिळवताना सत्ताधाऱ्यांशी जवळीक असणे फायदेशीर ठरते, हीदेखील एक मोठी बाब मानली जात आहे. शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची दिशा बदलणार का याशिवाय, पक्ष आणि निवडणूक चिन्हापेक्षा सध्याच्या सत्तेचा फायदा घेणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना काही खासदारांमध्ये निर्माण झाल्याचे सांगितले जाते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निवडणूक लढवून मतदारांनी त्यांना स्वीकारल्याचा मुद्दाही या चर्चेत महत्त्वाचा ठरत आहे. मात्र, भाजप हायकमांडकडून आलेल्या या ‘ब्रेक’मुळे शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची दिशा बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.