सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी मनसेच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. बिनविरोध निवडून येण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. पण आता ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचा दावा केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
सोलापूर महापालिकेसाठी येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची बिनविरोध निवडणुकीसाठी हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहेत. भाजपने प्रथम बाळासाहेब सरवदे यांच्या चुलत भावाच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. पण नंतर त्यांचा पत्ता कट करण्यात आला होता. त्यातून झालेल्या वादातून सरवदे यांची हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपने एबी फॉर्म खिडकीतून दिले प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपला सर्वत्र बिनविरोध निवडणुका हव्या होत्या. सोलापुरातील निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) अजूनही उमेदवार याद्या देत नाहीत. भाजपने 100 टक्के एबी फॉर्म हे खिडकीतून दिले आहेत. आम्ही त्याविरोधात कोर्टात दाद मागणार आहोत. अर्ज मागे घेण्यासाठी भाजपने उमेदवारांना अक्षरशः उमेदवार फरफटत नेले. काल याच वादातून मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाली. पण आता ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचे सांगण्यात येईल. या प्रकरणी सीसीटीव्ही व इतर साहित्य तपासून या घटनेमागे कोण आहे? हे तपासून पाहिले पाहिजे. सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराना धमक्या येतात. बंडखोर उमेदवारांवरही दबाव टाकला जात आहे. पालकमंत्र्यांनी त्यांच्या स्वतःच्या पदाचा आदर राखला पाहिजे. कारण, ते फारच खालच्या पातळीवर जाऊन निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मर्डर झाला. भाजपकडे उमेदवार नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाही. त्यामुळे ते महाविकास आघाडीचे उमेदवार घेत आहेत. प्रशासनावरील दबाव असेल किंवा माघार घेण्याच्या दिवशी झालेले नाटक असेल त्यातून भाजप पूर्णतः उघडा पडला आहे, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. मविआच्या प्रचाराचा नारळ 5 तारखेला फुटणार महाविकास आघाडीचा सोलापुरातील प्रचार 5 तारखेला सुरू होईल. काँग्रेस इथे हिंमतीने लढा देत आहेत. त्यामुळे इथे आमचाच विजय होईल. याऊलट भाजप इथे रक्तावर राजकारण करत आहेत. भाजपचे लोक केवळ पैसे मिळतात म्हणून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना खोके मिळतात म्हणून ते लढतात. इथे भाजपचे दोन ज्येष्ठ आमदार आहेत. त्यांना पालकमंत्री व मंत्रिपद मिळाले. पण त्यानंतरही त्यांना डावलले जात आहे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, असेही प्रणिती शिंदे यावेळी बोलताना म्हणाल्या. कशी झाली बाळासाहेब सरवदेंची हत्या? दुसरीकडे, बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका व प्रभाग क्रमांक 2 च्या उमेदवारासह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप उमेदवार शालन शिंदे व भाजपच्या बंडखोर उमेदवार रेखा सरवदे यांच्या कुटुंबियांत वाद झाला होता. यावेळी शालन शंकर शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी फेकली होती. तर इतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले, असा आरोप मृत बाळासाहेब यांचे बंधू बाजीराव पांडुरंग सरवदे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
