जहाज युद्धक्षेत्रात अडकल्यानंतरचे ते तीन महिने एखाद्या भीषण स्वप्नासारखे होते. होर्मुझच्या समुद्रधुनीत सातत्याने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा धोका होता. इराणी सैन्याच्या रडारवर येऊ नये म्हणून आम्ही जहाजावरील सर्व लाईट्स आणि टँकर्स बंद करून अंधारात जीव मुठीत धरून बसायचो. डोळ्यांसमोर क्षेपणास्त्रांचे स्फोट होताना दिसत होते. मनात मृत्यूची भीती होती, पण स्वतःवरचा ताबा सुटू दिला नाही, असे शब्दांत इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या भडक्यात ‘होर्मुझच्या समुद्रधुनीत’ तीन महिने मृत्यूशी झुंज देणारी राहुरीची तरुणी तेजस्विनी अक्षय खैरे हिने तो थरारक अनुभव सांगितला. तेजस्विनी सुखरूप मायदेशी परतली आहे. फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय मालवाहू जहाजावर कार्यरत असताना समुद्रातील युद्धजन्य परिस्थिती, क्षेपणास्त्रांचा थरार आणि सततच्या भीतीच्या सावटाखाली कित्येक आठवडे घालवल्यानंतर तेजस्विनी जेव्हा राहुरीत आपल्या घरी पोहोचली, तेव्हा कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. तेजस्विनीचा दुसरा जन्मच झाल्याची भावना व्यक्त करत खैरे कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी मारले गेले. यानंतर इराणने अमेरिकन तळांवर प्रतिहल्ले चढवत जगातील महत्त्वाचा व्यापारी जलमार्ग असलेली ‘होर्मुझची समुद्रधुनी’ रोखून धरली. तेजस्विनी खैरे ही फ्रान्सच्या ‘सीएमए, सीजीएम’ या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या ‘सीएमए, सीजीएम मॅनअस’ या मालवाहू कंटेनर जहाजावर कार्यरत होती. भारताच्या ध्वजाखाली प्रवास करणारे हे जहाज संयुक्त अरब अमिरातीच्या खलिफा बंदरातून निघून अमेरिकेतील ऑरेंज बंदराच्या दिशेने जात होते. मात्र, काही मिनिटांचा प्रवास बाकी असतानाच युद्ध पेटले आणि हे जहाज इराणच्या युद्धक्षेत्रात अडकले. तेजस्विनी मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडल्याबद्दल तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने जल्लोष केला. तिला मायदेशी सुखरूप आणण्यासाठी खैरे कुटुंबीयांनी भारतीय नौदल, डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग आणि जहाजाच्या व्यवस्थापन कंपन्यांचे विशेष आभार मानले. अत्यंत प्रतिकूल आणि जीवघेण्या परिस्थितीतही तेजस्विनीने दाखवलेले धैर्य आणि संयम कौतुकास्पद ठरत आहे.तिच्या या संघर्षमय प्रवासाची आणि सुटकेची चर्चा सध्या संपूर्ण नगर जिल्ह्यात सुरू असून, संकट कितीही मोठे आणि जीवघेणे असले तरी जर मनातील धैर्य आणि विश्वास कायम ठेवला, तर मृत्यूच्या दारातूनही सुखरूप मार्ग निघू शकतो, हाच संदेश तेजस्विनीच्या या थरारक अनुभवातून समोर आला आहे.