सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सुर्ला येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवार (दि. २२ एप्रिल २०२६) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव विलास हरिचंद्र मेश्राम (वय ५१, रा. सुर्ला, ता. झरी जामणी, जि. यवतमाळ) असे आहे. मेश्राम यांच्याकडे सुमारे पाच एकर शेती असून ते शेतीच्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, गेल्या काही काळापासून सततची नापिकी आणि आर्थिक अडचणींमुळे ते मानसिक तणावाखाली होते. याच नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मेश्राम यांनी घरच्यांना आयपीएल सामना पाहण्यासाठी शेजाऱ्यांकडे जात असल्याचे सांगून घर सोडले होते. मात्र ते रात्री परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत होते. आज सकाळी कुटुंबीय शेतात गेले असता, त्यांनी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मेश्राम यांचा मृतदेह पाहून एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जयंत कोरवते करीत आहेत.
मेश्राम यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, सततच्या नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे.
