तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 13 महिलांवर वाघिणीचा हल्ला:4 महिला ठार, चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलातील भयंकर घटना

जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने केलेल्या हल्ल्यात तब्बल 4 महिलांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात घडली आहे. या घटनेत इतर काही महिला जखमी झाल्याची माहिती आहे. गतवर्षी 10 मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल) जंगलात वाघाने 3 महिलांचा बळी गेला होता. त्यानंतरही ही दुसरी मोठी घटना आहे. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या महिलांचा बळी हा प्रशासकीय अनास्थेने केलेला घात असल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. गुंजेवाही येथील 13 महिलांचा एक समूह शुक्रवारी सकाळी तेंदूपत्ता वेचण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. तेंदूपत्ता वेचण्याचे काम सुरू असताना या महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे या महिला घाबरल्या व जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटल्या. पण वाघाने 4 महिलांवर झडप घातली. त्यात त्यांचा बळी गेला. इतर महिलांपैकी 1 महिला ओरडतच गावात आली. तिने आरडाओरडा करत गावकऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. 4 महिला ठार, इतर सुखरूप गावकरी लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिथे 4 महिलांचे मृतदेह आढळून आले. यावेळी इतर महिला सुखरूप असल्याची माहिती आहे. वनविभागानेही घटनास्थळी पोहोचून स्थितीचा आढावा घेतला. तसेच पुढील तपास सुरू केला. या घटनेत कवडूबाई दादाची मोहुर्ले (45), अनुबाई दादाजी मोहुर्ले (46), संगीता संतोष चौधरी (36) व सुनीता कौशिक मोहुर्ले (33) या 4 महिलांचा बळी गेला. यामुळे मोहुर्ले व चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. गतवर्षी गेला होता 3 महिलांचा बळी दुसरीकडे, वाघाच्या हल्ल्यात एकाचवेळी 4 महिलांचा बळी गेल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वन विभागाने नागरिकांना जंगल परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच संबंधित भागातील गस्तही वाढवण्यात आली या घटनेमुळे गतवर्षी मेंढा (माल) घटनेच्या कटू आठवणी ताज्या झाल्या असून, तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गतवर्षी सिंदेवाही तालुक्यातीलच मेंढा (माल) जंगलात वाघाने तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर हल्ला केला होता. त्यात 3 महिलांचा बळी गेला होता. त्यानंतर आजच्या हल्ल्यात तब्बल 4 महिलांचा बळी गेला आहे. 4 महिलांचा बळी हा प्रशासकीय अनास्थेचा घात – विजय वडेट्टीवार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या महिलांचा बळी हा प्रशासकीय अनास्थेने केलेला घात असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या चार निष्पाप भगिनींचा वाघिणीच्या हल्ल्यात झालेला मृत्यू ही निव्वळ दुर्घटना नाही, तर तो प्रशासकीय अनास्थेने केलेला घात आहे! हे सरकार नक्की झोपलंय कुठे? ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी जनता पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात जाते. त्यांना सुरक्षा देणे हे वन विभागाचे आणि सरकारचे कर्तव्य नाही का? वाघ-मानव संघर्ष काही आज नवीन नाही. रोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत, निष्पाप गरिबांचे बळी जात आहेत, पण सरकार आणि वन विभाग अजूनही कुंभकर्णासारखे झोपेत आहे. जंगलावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने कोणती ठोस पावले उचलली? ॲक्शन प्लॅन कुठे आहे? वन विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. अधिकारी फक्त वातानुकूलित केबिनमध्ये बसून बैठका मारणार की प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काही काम करणार?
कष्टकऱ्यांच्या जिवाची किंमत शून्य का? जर एखादा वाघ मारला गेला तर लगेच चौकशी समित्या बसतात, पण एकाच वेळी ४ गरीब महिलांचे बळी जातात तेव्हा प्रशासन एवढं सुस्त कसं राहू शकतं? ग्रामीण भागातील जनतेने स्वतःचा जीव मुठीत धरून किती दिवस जगायचं? सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहू नये, असे वडेट्टीवार म्हणाले.
खाली पाहा घटनेचे काही फोटो

आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…

Leave a Comment

error: Content is protected !!