माळशिरस तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित गावातील शेतकऱ्यांच्या भावना आणि मते जाणून घेण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद सुरू केला आहे. माळशिरस तालुक्यातील १२ गावे या महामार्गात बाधित होत असून या बाधित शेतकऱ्यांचा प्रकल्पाला कडाडून विरोध होत आहे, तर दुसरीकडे समर्थकांनीही स्वतंत्र मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच, शेतकऱ्यांना समक्ष भेटून मते जाणून घेण्याचे दिलेले आश्वासन पाळत खासदारांनी गुरुवार दि. २१ मे पासून हा महत्त्वाचा दौरा माळशिरस तालुक्यातून सुरू केला आहे. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गुरुवारी वेळापूर, उघडेवाडी, गारवाड, मगरवाडी, चांदापुरी, तरंगफळ आणि निमगाव आदी गावांमध्ये जाऊन तेथील शेतकऱ्यांच्या भावना आणि मते जाणून घेतली. यावेळी आयोजित बैठकांमध्ये बाधित शेतकऱ्यांनी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या आपल्या सुपीक जमिनी, शेतीचे होणारे मोठे नुकसान, पुनर्वसनाचा प्रश्न, दिला जाणारा मोबदला, तसेच स्थानिकांच्या इतर विविध अडचणींबाबत खासदारांसमोर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या दौऱ्यात त्यांच्यासोबत माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर हे प्रामुख्याने उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्गाचा हा वाद आता केवळ स्थानिक पातळीवर राहिला नसून त्याला मोठे राजकीय परिमाण लाभले आहे. महामार्ग विरोधी बाधितांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून बळ दिले आहे. माळशिरस तालुक्यातील १२ गावे या प्रकल्पात पूर्णपणे बाधित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्या पाठिंब्यामुळे आंदोलकांची ताकद वाढली आहे. आता खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी स्वतः फिरून गोळा केलेली ही मते आणि शेतकऱ्यांचा हा तीव्र विरोध दिल्ली आणि मुंबईच्या दरबारात कशा प्रकारे मांडला जातो, यावरच शक्तीपीठाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. महामार्गाचा विषय आणखी तीव्र होणार
