सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय अर्थमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे त्यांचा राज्य मंत्रिमंडळात चंचूप्रवेश होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर तीव्र आक्षेप घेत मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले तर मी बीडमध्ये जाऊन उपोषण करेन, असा इशारा दिला आहे. सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नाशिक कोर्टाने सदनिका घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. यामुळे त्यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी काल अचानक दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे धनंजय मुंडे यांचा कोकाटे यांच्या जागी मंत्रिमंडळात प्रवेश होणार का? अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना उपरोक्त इशारा दिला आहे. मुंडेंना मंत्री केले तर आम्ही स्वस्थ बसणार नाही – सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली याचे मला वाईट वाटते. ज्या नेत्यावर टोकाचे आरोप झाले आहेत, त्यांना अमित शहा कशी काय भेट देतात? धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नसले तरी, आरोपांमध्ये तथ्य असल्याशिवाय राज्य सरकारने त्यांचा राजीनामा घेतला का? आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचे प्रयत्न होत असतील तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. मुंडेंना पुन्हा मंत्री केले तर आम्ही बीडला जाऊन उपोषण करू आणि राज्यभरात मोठे आंदोलन छेडू, असे त्या म्हणाल्या. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला पर्यायाने महायुती सरकारला कायदेशीर झटका बसला आहे. त्यातच आता धनंजय मुंडे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशावरून शरद पवार गटाने थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात सत्ताधारी व विरोधकांत मोठा संघर्ष दिसून येण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द उल्लेखनीय बाब म्हणजे राज्याचे क्रीडा व युवककल्याण, अल्पसंख्याक विकास व वक्फ मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार त्यांची आमदारकी आपोआप रद्द झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंची खाती काढून ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवा, असे पत्र बुधवारी रात्री राज्यपालांना दिले. त्यानुसार राज्यपालांनी कार्यवाहीदेखील केली आहे.