आपल्याला जीवनात प्रगती साधायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ”शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मूलमंत्र आणि सर्वसामान्यांसाठी खुली झालेली आरक्षणाची दारे यामुळेच माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील माणसाला उच्च पदस्थ अधिकारी होण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन नुकतेच सेवानिवृत्त झालेले कामगार उपायुक्त राजेश आडे यांनी केले. नवयुवक पंचशील मंडळ, लोणी यांच्या वतीने बुद्ध विहारात आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्कार समारंभाला उत्तर देताना ते बोलत होते. लोणी-जवळा हा परिसर माझ्या भावनेशी जुळलेला असून, सेवानिवृत्तीनंतरचे संपूर्ण आयुष्य या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठीच अर्पण करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक हेमंतकुमार कांबळे होते. त्यांनी आपल्या भाषणात राजेश आडे यांच्या कार्याचा गौरव केला. “गावातून शिकून मोठ्या पदावर गेलेल्या व्यक्तीने आपल्या गावाकडे, आई-वडिलांकडे आणि समाजातील मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले तर ग्रामीण भागाची प्रगती अधिक सोपी होईल. शिकलेली माणसे अनेकदा गावाकडे वळत नाहीत; परंतु राजेश आडे यांनी आयुष्यभर गावाशी व येथील सुख-दुःखाशी आपली नाळ जोडून ठेवली आहे,” असे कांबळे म्हणाले. तसेच, सुशिक्षित माणसांनी राजकारणात येणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन जितेंद्र सोनोने सर यांनी केले. कार्यक्रमाला लोणी गावचे सरपंच अमोल वारंगे, माजी सरपंच वसंत खारोळ, ग्रामपंचायत सदस्य बाळू गायधने, सामाजिक कार्यकर्ते मनोज नागापुरे आणि अमित रामटेके आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रकाश सोनटक्के, प्रवीण सोनटक्के, यशवंत मसादकर आणि गौतम साखरकर यांनी अथक परिश्रम घेतले.
